रत्नागिरीतील पत्रकार शशिकांत वारीसे यांच्या हत्या प्रकरणावरून राज्यातील राजकीय वातावरण पेटलं आहेय. विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरत शिंदे फडणवीस सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. अशातच शिंदे-फडणवीस सरकारच्या वतीने मृत पत्रकार शशिकांत वारीसे यांच्या कुटुंबियांना 25 लाखांची आर्थिक मदत केली जाणार आहे. याबाबत राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी माहिती दिली. (Announcement of 25 lakhs assistance from the government to the family of deceased journalist Shashikant Warisen)
उद्योगमंत्री उदय सामंत यांनी ट्विटरवर व्हिडीओ शेअर करत पत्रकार शशिकांत वारीसे यांच्या कुटुंबियांना मदत दिली जाणार असल्याचे सांगितले. “शशिकांत वारीसे यांची हत्या करण्यात आली होती. त्यांच्या हत्येनंतर आरोपीला अटक केली. त्यानंतर महाराष्ट्रातील पत्रकारांनी, रत्नागिरीतील स्थानिक पत्रकारांनी आणि सर्वसामान्य जनतेने मृत पत्रकाराच्या कुटुंबियांना महाराष्ट्र सरकारकडून आर्थिक मदत देण्याची मागणी केली होती. या पत्रकारांच्या मागणीनंतर मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बातचीत केली. त्यावेळी त्यांनी मृत पत्रकार शशिकांत वारीसे यांच्या कुटुंबियांना 25 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा करण्यास सांगितले”, असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
मयत पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या कुटुंबियांना शासनाकडून 25 लाखांची मदत देण्याची घोषणा
– पालकमंत्री @samant_udayमयत वारिसे यांच्या मुलाला कायम स्वरूपाची नोकरी देण्याची जबाबदारीही स्वीकारली pic.twitter.com/m38k6xTjAD
— जिल्हा माहिती कार्यालय,रायगड-अलिबाग (@InfoRaigad) February 12, 2023
“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनंतर मृत पत्रकार शशिकांत वारीसे यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत कशा पद्धतीने केली जाणार? तसेच ही मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून केली जाणार? किंवा अन्य कोणत्या ठिकाणाहून केली जाणार? याबाबत सरकार जबाबदार असेल”, असेही उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
“मृत पत्रकार शशिकांच वारीसे यांच्या पूत्र सध्या आयटीआयचे शिक्षण घेत आहेत. भविष्यात त्यांच्या मुलाला नोकरीची गरज आणि पुढे शिक्षण करावेसे वाटले तर त्याचा सगळा खर्च मी पालकमंत्री म्हणून करीन”, असेही उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
हेही वाचा – तुर्की-सीरियातील भूकंपात 28 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू; लाखो मदतीच्या प्रतीक्षेत