घरमहाराष्ट्रपवारांना राज्य सरकारचा झटका; बारामतीला जाणारं अतिरिक्त पाणी वळवलं!

पवारांना राज्य सरकारचा झटका; बारामतीला जाणारं अतिरिक्त पाणी वळवलं!

Subscribe

शरद पवारांच्या बारामतीचं पाणी अखेर नीरेच्या उजवा कालवा क्षेत्रात येणाऱ्या तालुक्यांना वळवण्यात राज्य सरकारला यश आलं आहे.

लोकसभा निवडणुकीत माढा मतदारसंघात गाजलेल्या नीरेच्या पाण्याचा प्रश्‍न मतमोजणीनंतर अवघ्या काही दिवसांतच दोन रणजितसिंहांच्या तगाद्यामुळे जलसंपदा विभागाने सोडवला आहे. बारामती आणि इंदापूरला जाणार्‍या अतिरिक्त पाण्याला माळशिरस, फलटण, सांगोला आणि पंढरपूरकडे वळविण्याचा अध्यादेशच आता काढण्यात आला आहे. यामुळे नीरा डावा कालवा लाभक्षेत्रात नाराजीचा सूर असला तर उजवा कालवा परिसरात मात्र आनंदाचे वातावरण आहे. माढा लोकसभा मतदारसंघात भाजपाला सर्वाधिक मताधिक्य ज्या विजयसिंह मोहिते पाटील यांनी दिले त्यांच्याच वाढदिवसाच्या दिवशी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी माळशिरस, माढा, सांगोला आणि फलटण तालुक्याला पाण्याची भेट दिल्याची जोरदार चर्चा रंगली आहे.


हेही वाचा – बारामतीला जाणारे पाणी बंद; शरद पवारांची संतप्त प्रतिक्रिया

काय होता वाद?

वीर-भाटघर धरणाच्या उजव्या कालव्याद्वारे ५७% आणि डाव्या कालव्याद्वारे ४३% पाणी वाटपाचे धोरण १९५४ च्या पाणी वाटप कायद्यानुसार ठरले होते. त्यानुसार उजव्या कालव्यातून सातारा जिल्ह्यातील फलटण तर सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस, सांगोला आणि पंढरपूर या तालुक्यांना पाणी मिळत होते. डाव्या कालव्यातून बारामती आणि इंदापूर तालुक्याला पाणी मिळत होते. राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली राजकीय ताकद वापरून २००९ मध्ये या पाणी वाटप करारात बदल केला. त्यामध्ये नीरा देवधर धरणाचे ६० टक्के पाणी डाव्या कालव्यातून बारामती, इंदापूर तालुक्याला आणि ४० टक्के पाणी फलटण, माळशिरस, सांगोला, पंढरपूर तालुक्याला देण्याचा निर्णय घेतला. हा करार ३ एप्रिल २०१७ पर्यंत होता. मात्र करार संपूनही आत्तापर्यंत डाव्या कालव्याला साठ टक्के पाणी सोडणे सुरूच होते.

- Advertisement -

निंबाळकरांचे आश्वासन आणि सरकारचे आदेश!

नीरा उजवा कालवा हा माढा लोकसभा मतदारसंघाचा भाग असून यात फलटण, माळशिरस, सांगोला आणि पंढरपूरचा भाग आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत फलटणचे रणजितसिंह नाईक निंबाळकर हे भाजपाचे उमेदवार होते. त्यांनी निवडणूक काळात बारामतीला जाणारे नीरेचे माढा मतदारसंघाचे हक्काचे पाणी परत आणण्याचे आश्‍वासन मतदारांना दिले होते. याच विषयावर त्यांनी पवार काका पुतण्यांवर टीका केली होती. दरम्यानच्या काळात रणजितसिंह मोहिते पाटील हेही भाजपातच आल्याने या भागातून नीरेच्या पाण्यासाठी जलसंपदा विभागाकडे तगादा लावण्यासाठी दोन मातब्बर तरूण नेते समोर आले. लोकसभा निवडणुकीत माढ्यात भाजपाचे कमळ फुलताच काही दिवसांतच बैठक झाली. यावेळी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी डाव्या कालव्याच्या पाण्याचा करार संपल्याने देवधर धरणाचे पाणी आता उजवा कालव्यावरील लाभक्षेत्राला देण्यासंदर्भात कार्यवाही करण्याचे आदेश दिले.


हेही वाचा – ईव्हीएम नाहीच, ‘हा’ खरा प्रॉब्लेम – शरद पवार

शेतकऱ्यांनी केले होते पाण्यासाठी आंदोलन

यामुळे सहाजिकच पवारही नाराज झाले होते. त्यांनी ‘पाण्याचे राजकारण करू नका’ असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदामंत्री गिरीश महाजन महाजन यांना केले होते. यानंतर आज १२ जून रोजी जलसंपदा विभागाने ६० टक्के पाणी हे उजवा कालव्याला देण्याचे आदेश काढले आहेत. दरम्यान मागील वर्षी कमी पाऊस झाल्याने नीरा खोर्‍यात ही पाणीटंचाई आहे आणि सतत कालव्यात पाणी सोडण्यासाठी आंदोलनं झाली आहेत. माळशिरस, फलटण, सांगोला आणि पंढरपूरचा जो भाग नीरा उजवा कालव्यावर आहे तो अवर्षण प्रवण क्षेत्रातील आहे. आता या भागाला जास्त पाणी मिळणार असल्याने येथे आनंदाचे वातावरण आहे. राज्य सरकारने कोणत्याही दबावाखाली न येता उजवा कालवा लाभक्षेत्राला साठ टक्के पाणी देण्याचा निर्णय घ्यावा, यात बदल करू नये यासाठी सांगोल्यात चार दिवसांपूर्वीच भाजपा कार्यकर्ते आणि शेतकर्‍यांनी आंदोलन केले होते.

- Advertisement -

पूर्ण ११ टीएमसी पाणी उजवा कालवा क्षेत्राकडे

आत्तापर्यंत या धरणातून ६० टक्के म्हणजेच सहा टीएमसी पाणी बारामती आणि इंदापूर तालुक्याला आणि ४० टक्के म्हणजेच पाच टीएमसी पाणी फलटण, माळशिरस, सांगोला, पंढरपूर तालुक्याला मिळत होते. आता संपूर्ण अकरा टीएमसी पाणी फलटण, माळशिरस, सांगोला, पंढरपूर तालुक्याला मिळणार आहे. यामुळे माढा लोकसभा मतदारसंघात आनंदाचे वातावरण पसरले आहे तर बारामती आणि इंदापूर भागात नाराजीचा सूर आहे. नीरेच्या पाण्यावर त्या भागातही शेतकर्‍यांनी मोठ्या प्रमाणात ऊस लागवड केली आहे. पण आता त्यांच्यासमोर पाणीटंचाईचे संकट उभे ठाकणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -