बीड जिल्ह्यातील तीन नगरपंचायतीमध्ये भाजप जिंकले आहे. बीड जिल्ह्यातील आष्टी, पाटोदा आणि शिरुरमध्ये भाजपची सत्ता आली आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रसचे नेते आणि बीडचे पालकमंत्री धनजंय मुंडेंवर निशाणा साधला. पंकजा मुंडे म्हणाल्या की, ‘सत्ता असून देखील यश मिळवण्यात सत्ताधारी कमी पडले आहेत. लोकांनी भाजपला पहिली पसंती दिली आहे.’ यावर धनंजय मुंडे माध्यमांशी बोलताना म्हणाले की, ‘वडवणी नगरपंचायत आमच्या दृष्टीने प्रतिष्ठेची होती, ती नगरपंचायत आम्ही जिंकली आहे. केजमध्ये भाजपला एक कमळ सुद्धा उभा करता आला नाही. मराठवाड्यात नाहीतर उभ्या महाराष्ट्रामध्ये राष्ट्रावादी काँग्रेस नगरपंचायतीमध्ये पक्ष नंबर एक म्हणून पुढे आलेला आहे.’
नक्की काय म्हणाले धनंजय मुंडे?
माध्यमांशी बोलताना धनंजय मुंडे म्हणाले की, ‘आम्हाला तीन नगरपंचायतीमध्ये पराजय प्राप्त झाला. पण वडवणी भाजपची प्रतिष्ठेत नगरपंचायत होती ती मात्र एकलहाती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिंकली आहे. वडवणी आमच्या दृष्टीने प्रतिष्ठेची होती, भाजपच्या दृष्टीनीही प्रतिष्ठेची होती. ती नगरपंचायत आम्ही जिंकली आहे. शिरुर, आष्टी, पाटोदा तिन्ही ठिकाणी विधानपरिषदेचे आमदार सुरेश धस त्यांच्या प्रभावामुळे बराच प्रयत्न केला. पण आम्हाला तिथे जिंकता आले आहे.’
पुढे धनंजय मुंडे म्हणाले की, ‘दरम्यान भाजपला केजमध्ये एक कमळ सुद्धा का उभे केले नाही. केजमध्ये त्यांना त्यांच्या पक्षाचे चिन्ह देण्याइतपत उमेदवार मिळाले नाहीत. केजमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने पाच जागा जिंकल्यात आणि दोन नंबरला आज भाजप पक्ष आहे. काँग्रेससुद्धा आज तीननंबरला गेलेला आहे. मराठवाड्यात नाहीतर उभ्या महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस नगरपंचायतीमध्ये पक्ष नंबर एकचा पक्ष म्हणून पुढे आलेला आहे. खरंतर या नगरपंचायतीच्या निवडणुका स्थानिक पातळीवर वेगवेगळ्या आघाडीकरून लढवल्या जातात. पहिल्यांदाच या निवडणुका पक्ष पातळीवरती पक्षाच्या राजकारणात आल्या आहेत. आणि अशा निवडणुका झाल्यानंतर सुद्धा यामध्ये सर्व महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसचा पक्ष एकनंबरचा येतो. शिवसेना दोन नंबरची येते आणि नंतर भाजपला नंबर कुठेतरी मिळतो. हे मात्र आता काय वातावरण चाललंय हे निश्चितच आपल्या सर्वांच्या लक्षात येणार आहे. हे वातावरण आता महाविकास आघाडीच्या बाजूने जाताना दिसत आहे.’