मुंबई : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी 10 जानेवारीला दिला. या निकालानंतर शिवसेनेच्या दोन्ही गटाने न्यायालयाची दारे ठोठावली आहेत. अशातच आता शिवसेनेने (ठाकरे गट) मंगळवारी (16 जानेवारी) महापत्रकार परिषद घेत एकापाठोपाठ एक खुलासे केले आणि राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालावर टीका करताना काही व्हिडीओ दाखवले. मात्र यानंतर आता आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहे. भाजपाचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. (BJP Duryodhana Shakuni Mamas treachery led to Mahabharata BJP targets Mahaptrakar Council)
हेही वाचा – Ram Mandir : राजीव गांधींच्या काळातच झाली होती राम मंदिराची पायाभरणी, शरद पवारांचा दावा
आशिष शेलार यांनी ट्वीट करताना म्हटले की, दुर्योधन आणि शकुनी मामाच्या धोका आणि “महा” कपटामुळेच “महा”भारताचे युध्द झाले होते आणि पांडवांच्या हातून सर्व कौरवांचा “महा”नाश झाला. नेहमी एक खोटं लपवण्यासाठी “महा” खोटे बोलावे लागते. मुख्यमंत्रीपदासाठी “महा”कपट, “महा”धोका केला नसता, अडीच वर्षे, असं काही ठरलं नसतानाही “महा”खोटं बोलला नसता, रोज सकाळी खोटं बोलणाऱ्या “महा”शकुनीला आवरले असते, तर अशी “महा”पत्रकार परिषद घेण्याची वेळ आली नसती. जैसे ज्याचे कर्म तैसे, फळ देतो रे ईश्वर, अशा गाण्याच्या ओळी लिहत आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंना जोरदार टोला लगावला आहे.
◆दुर्योधन आणि शकुनी मामाच्या धोका आणि “महा” कपटामुळेच “महा”भारताचे युध्द झाले.
◆म्हणून पांडवांच्या हातून सर्व कौरवांचा “महा”नाश झाला.
तसेच
◆नेहमी एक खोटं लपवण्यासाठी “महा” खोटे बोलावे लागते!◆मुख्यमंत्रीपदासाठी “महा”कपट, “महा”धोका केला नसता…
◆अडीच वर्षे..असं काही ठरलं…— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) January 17, 2024
हेही वाचा – Iran Airstrike on Pakistan : इराणचा पाकिस्तानातील बलुच दहशतवादी ठिकाणांवर हवाई हल्ला
उद्धव ठाकरे काय म्हणाले?
उद्धव ठाकरे म्हणाले की, वाईट याच गोष्टीचं वाटतं की, ज्या महाराष्ट्रामध्ये रामशास्त्री प्रभुणे जन्माला आले, जिथे संविधानकर्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले तिथुनच यांनी लोकशाहीची हत्या करायला सुरुवात केली आहे. समजा 1999 ला असलेली आमची घटना शेवटची होती, मग 2014 साली मोदींना पाठिंबा द्यायला मला का बोलावलं होतं? 2019 साली का बोलावले होते? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. तसेच मोदीजी म्हणाले होते की, आता बाळासाहेब राहिले नाहीत, मला सल्ला घ्यायचा असेल तर मी उद्धव ठाकरेंसोबत चर्चा करतो, ते काय होतं? माझं नेतृत्व मान्य नव्हतं तर अमित शहा मातोश्रीवर का येत होते? पाच वर्ष देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री पद उबवलं ते कोणाच्या जोरावर? त्या मिंध्याबिंध्यांना पद, एबी फॉर्म, मंत्रीपद मीच दिली होती की नाही? असा प्रश्नांचा भडीमार उद्धव ठाकरे यांनी केला.