एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीसोबत युती करण्यास तयार असल्याचे वक्तव्य करताच राज्याच्या राजकीय वर्तुळामध्ये खळबळ माजली आहे. अनेक पक्षांकडून आता या युतीच्या चर्चांवरून आरोप प्रत्यारोप सुरु आहे. मात्र महाविकास आघाडी यावर काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. कारण महाविकास आघाडीतील प्रमुख तीन पक्षांमध्ये शिवसेना एक आहे. याचवरून आता भाजपा आमदार नितेश राणे यांनी ट्विटरवरून महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.
एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला युतीची ऑफर दिली आहे. या ऑफर स्पष्टीकरण देत इम्तियाज जलील म्हणाले की, एमआयएमवर आरोप करण्यात येतो आमच्यामुळे भाजपा जिंकते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भेट युतीची ऑफर दिली आहे. एकदा हे संपवायचे असल्यास तुम्ही आमच्यासोबत युती करण्यास तयार आहात का? त्यावर ते काही बोलले नाही. आता बघायचे आहे की , त्यांना फक्त आरोप करायचे आहे की त्यांना भूमिका सिद्ध करायची आहे. असं इम्तियाज जलील यांनी म्हटले. यावरून नितेश राणे यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकेचे बाण सोडले आहेत.
नितेश राणे यांनी ट्विट करत म्हटले की, “वाह.. AIMIM ची महाविकास आघाडी मध्ये येण्याची तयारी… कट्टरपंथीना पण शिवसेना आपलीशी वाटायला लागली आहे… आता फक्त ISIS चा प्रस्ताव येणे बाकी आहे… खरंच, करून दाखवलं!!.
वाह.. AIMIM ची महाविकास आघाडी मध्ये येण्याची तयारी..
कट्टरपंथीना पण शिवसेना आपलीशी वाटायला लागली आहे..
आता फक्त ISIS चा प्रस्ताव येणे बाकी आहे..
खरंच, करून दाखवलं!!— nitesh rane (@NiteshNRane) March 19, 2022
संजय राऊतांनी धुडकावली युतीची ऑफर
“भाजपा आणि एमआयएमची छुपी युती असल्याचे म्हणत औरंगजेबाच्या कबरीपुढे गुडघे टेकणारे महाराष्ट्राचे आदर्श होऊ शकत नाही किंवा शिवसेनेचे आदर्श होऊ शकत नाही.” असं शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एमआयएमच्या ऑफर धुडकावली आहे.
संजय राऊत म्हणाले की, “महाराष्ट्रात तीन पक्षाचचं सरकार आहे. तीन पक्षाचंच सरकार राहिल. चौथा कोण, पाचवा कोण यात तुम्ही का पडताय? शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस महाराष्ट्रातील हे प्रमुख पक्ष छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या विचाराने चालणारे पक्ष आहेत. हे आमचे आदर्श आहे. एखाद्या पक्षाचे नेते औरंगजेबाच्या कबरी पुढे जाऊन गुडघे टेकतात आणि औरंगजेब त्यांचा आदर्श आहे, हे महाराष्ट्राचे आदर्श होऊ शकत नाही किंवा शिवसेनेचे आदर्श होऊ शकत नाही. त्यामुळे या अफवा आहेत.”