घरमहाराष्ट्रलोकसभेसाठी भाजपचा 'शत: प्रतिशत'चा नारा; चंद्रशेखर बावनकुळे

लोकसभेसाठी भाजपचा ‘शत: प्रतिशत’चा नारा; चंद्रशेखर बावनकुळे

Subscribe


मुंबईः  पुढील वर्षी होऊ घातलेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी भाजपने शिवसेनेसह (मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट) राज्यातील ४८ जागा जिंकण्याचा निर्धार केला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी पक्षाच्या  स्थापनादिनी बोलताना कार्यकर्त्यांना युतीसह महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ आणि विधानसभेच्या २०० पेक्षा अधिक जागा जिकंण्यासाठी संकल्प करा, असे आवाहन केले.

अत्यंत प्रतिकूल काळात हजारो कार्यकर्त्यांनी जनसंघ आणि त्यानंतर भाजपची विचारधारा रुजविण्यासाठी प्रयत्न केले. या कार्यकर्त्यांनी केलेल्या त्यागावरच आज पक्ष उभा आहे. भारतीय जनता पक्षाची  स्थापना करताना अटलबिहारी वाजपेयी यांनी समृद्ध, विकसित, बलशाली भारताचे स्वप्न पाहिले होते. नरेंद्र मोदी यांनी अटलजींनी पाहिलेले सर्वश्रेष्ठ भारताचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्याच्या दिशेने पावले टाकली आहेत. त्यामुळेच भारत हा जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेला देश बनला आहे, असे बावनकुळे यांनी सांगितले.

- Advertisement -

यापुढील काळात राज्यात पक्ष वाढविण्यासाठी कार्यकर्त्यांनी पक्षाने दिलेल्या विविध कार्यक्रमांची अंमलबजावणी करून मोदी सरकार आणि राज्यातील शिंदे – फडणवीस सरकारची विकास कामे सर्वसामान्य माणसापर्यंत पोहचविली  पाहिजेत. ३ कोटी नवे सदस्य बनविण्याचे अभियान यशस्वी करण्याचा  निर्धार कार्यकर्त्यांनी स्थापना दिनाच्या निमित्ताने केला पाहिजे, असेही बावनकुळे म्हणाले.

यावेळी  बावनकुळे यांच्या हस्ते जनसंघापासून काम केलेल्या माजी केंद्रीय मंत्री राम नाईक, मुकुंदराव कुलकर्णी, मधू चव्हाण, कांताताई नलावडे, दिलीप गोडांबे, कर्नल चौधरी, कर्नल देशपांडे, अनंत मराठे, शैला पतंगे – सामंत, दिलीप हजारे, भरत कारंडे, श्रीपाद मुसळे, बाबा कुलकर्णी आदी ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला.

- Advertisement -

भारतीय जनता पक्षाच्या  स्थापना दिनानिमित्त भाजप प्रदेश कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला  विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, उच्च आणि  तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, कामगार मंत्री सुरेश खाडे, प्रदेश उपाध्यक्ष सुनील कर्जतकर, चित्रा वाघ, राज पुरोहित, कृपाशंकर सिंग, प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये आदी  उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -