उर्जित पटेल यांनी राजीनामा दिला, सुरजीत भल्ला यांनीसुध्दा राजीनामा दिला, यांनी सीबीआयची वाट लावली आहे, सीबीआयचे ऑफिसरच सीबीआयवर धाड टाकत आहेत, नोटबंदी केली त्याचा काय फायदा झाला तर काही नाही, व्यापार ठप्प झाले ते व्यापारी पुन्हा उठू शकले नाहीत. आज लोक रस्त्यावर कांदा फेकत आहेत. शेतकऱ्यांना आठ आणे देखील मिळत नाहीय. हे सरकार प्रत्येक वर्षी दोन कोटी रोजगार देणार होते. कुठे गेला रोजगार ? कुठे आहे स्मार्ट सिटी असा सवाल करतानाच आपल्याला फक्त स्मार्ट जॅकेट घालून मिरवणारे स्मार्ट पंतप्रधान मिळाले, असा टोला माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी लगावला.
पवारांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
शरद पवार यांच्याबाबत सांगायचे झालं तर संपूर्ण दिवस कमी पडेल असे सांगतानाच भुजबळ यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या. फुले, शाहू आंबेडकर यांच्या विचारांचे बाळकडू पवार यांना घरातच मिळाले. त्यांच्या घरातले लोक हे सत्यशोधक चळवळीतील होते. म्हणून तर पवार तळागाळातील लोकांचे प्रश्न ताबडतोब सोडवू शकतात, असे उदगार भुजबळ यांनी काढले.
आरक्षण देण्याचे काम पवारांनी केले
या राज्यातील तळागाळातील माणसाला आरक्षण देण्याचे काम शाहु महाराजानंतर पवार यांनी केल्याचेही भुजबळ यांनी सांगितले. यावेळी भुजबळ यांनी पवार यांच्या कामाच्या काही आठवणीही सांगितल्या. मुख्यमंत्री कसा असावा ते शरद पवार यांनी लोकांना सांगितले. ज्या कामात त्यांनी हात घातला ते काम झालंच म्हणून समजा असा त्यांच्या कामाचा धडाका होता हेही स्पष्ट केले. लोकांच्या उपयोगी पडेल अशा अनेक वास्तू मुंबईसह राज्यात उभारल्याचे सांगतानाच आताच्या काळात तर फक्त बोलणारेच आहेत. जायची वेळ आली तरी काम करत नाही, असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला.
मीडियाचे तोडं बंद करण्याचे काम सरकारने केले
मीडियातील लोकांचं तोंड बंद करण्याची कामगिरी या सरकारच्या काळात करण्यात आली. विरोधात कोणी बोलले तर त्याचा आवाज दाबला जातो. जे केलं ते फेडावं लागेल त्यामुळे आज पराभव होतोय, असेही भुजबळ यांनी पाच राज्यातील निवडणूकामध्ये भाजपचा दारुण पराभव झाल्यानंतर स्पष्ट केले. राष्ट्रवादी काँग्रेसलाही विधानसभा आणि लोकसभा जिंकायच्याच आहेत.आता लढाई सुरू झाली आहे. विजयी होत नाही तोपर्यंत थांबायचे नाही. यांनी कितीही त्रास दिला तरी आपण लढत रहायचं… हिंमत हरायची नाही असा जबरदस्त आत्मविश्वास भुजबळ यांनी कार्यकर्त्यांमध्ये भरला.