सोलापूर : राष्ट्रवादी पक्षाचे दिवंगत नेते भारत भालके यांचा मुलगा भगिरथ भालके यांनी आज बीआरएस पक्षात जाहीर प्रवेश केला. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत भालकेंच्या सरकोली गावात हा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी भगिरथ भालके यांनी त्यांनी घेतलेल्या निर्णयावर आनंद व्यक्त केले. तर तेलंगणात शेतकऱ्यांसाठी राबविण्यात उपाययोजनांबाबत त्यांनी आनंद व्यक्त केला. यावेळी तेलंगणाचे मुख्यमंत्री KCR यांनी महाराष्ट्रातील पक्षांवर आणि महाराष्ट्रातील नेत्यांवर निशाणा साधला. मी फक्त आता महाराष्ट्रात स्थिरावण्याचा प्रयत्न करतोय तरी महाराष्ट्रातील पक्ष हे चिंतेत का आहेत, असा प्रश्न विचारत त्यांनी महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्षांवर सडकून टीका केली आहे. (Chief Minister KCR targets parties in Maharashtra)
हेही वाचा – नाम याद रखना ‘असली वाली शिवसेना’; अभियंता मारहाणप्रकरणी अंबादासा दानवे यांची प्रतिक्रिया
यावेळी बोलताना केसीआर म्हणाले की, निवडणुका होत असतात. कुणी ना कुणी जिंकतच असतं. किती पक्षांना आपण पाठिंबा दिला. महाराष्ट्रासारख्या राज्यात मला एक पक्ष सांगा ज्यांना राज्य करण्याची संधी मिळाली नाही. काँग्रेसने 50 वर्ष राज्य केले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजपाला तुम्ही संधी दिली. त्यांना करायचे असते, तर यापैकी कुणीतरी एकाने तरी काम केलं असतं. तेलंगणासारख्या नव्या राज्यात शेतकऱ्यांसाठी सर्व योजना राबवल्या जाऊ शकतात तर महाराष्ट्रात का नाही? महाराष्ट्र तर एक मोठं, श्रीमंत राज्य आहे. इथे काय कमी आहे?, असा प्रश्न यावेळी केसीआर यांच्याकडून विचारण्यात आला आहे.
तसेच, हे सगळे एवढंच सांगत आहेत. पण जर का महाराष्ट्रात तेलंगणासारख्या योजना राबवल्या तर महाराष्ट्राचे दिवाळं निघेल. होय, इथल्या नेत्यांचं दिवाळं निघेल आणि शेतकऱ्यांची दिवाळी होईल अशी टीका केसीआर यांनी केली. तर आम्ही कुठून आणतोय पैसे? सगळे उलट-सुलट सांगतायत. विचित्र काहीतरी बोललं जातंय, असेही ते यावेळी म्हणाले.
भारतात 41 कोटी एकर शेतीयोग्य जमीन आहे. आपल्याकडे 1 लाख 40 हजार टीएमसी पाणी देईल इतका पाऊस पडतो. त्यातल्या निम्म्या पाण्याची वाफ होते. पण निम्मं पाणी आपल्याला वापरायला उपयोगी आहे. त्यामुळे योग्य नियोजन केलं, तर प्रत्येक एकरमध्ये भरपूर पाणी देता येईल, अशी माहिती देखील यावेळी केसीआर यांच्याकडून देण्यात आली.