मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येनंतर राज्यात सत्ताधारी विरोधक आमनेसामने आल्याचं चित्र आहे. विरोधकांकडून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी होत असतानाच भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ठाकरे गटावर निशाणा साधला आहे. आम्हालाही तत्कालीन सरकारची लक्तरेही आम्हाला वेशीवर टांगता येतील अशा शब्दांत त्यांनी महाविकास आघाडीसह ठाकरेंवर निशाणा साधला आहे. (Chitra Wagh On Thackeray The lust of the then government Chitra Wagh targets Thackeray)
राज्यात मागील काही दिवसांपासून गोळीबाराच्या घटना घडत आहेत. अगदी राज्यातील राजकीय नेतेच एकमेंकावर गोळ्या झाडत असल्याचे दिसून येत आहे. या सर्व वाढत्या घटनांमुळे विरोधकांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. विरोधकांच्या या टीकेला भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ट्वीट करत विरोधकांना प्रत्युत्तर दिलं आहे.
स्वर्गीय अभिषेक घोसाळकरांना भावपुर्ण श्रद्धांजली….🙏
स्वर्गीय अभिषेक घोसाळकरांच्या धक्कादायक मृत्यूचे उबाठा गटाकडून होणारे राजकारण दुर्दैवी आहे. कारण, सकृतदर्शनी या भयंकर घटनेत राजकारणाचा दुरान्वयानेही संबंध नाही. वैयक्तिक वैमनस्यातून ही घटना घडल्याचं प्राथमिक तपासात दिसून… pic.twitter.com/CvMTn8vrpO
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) February 9, 2024
उबाठा गटाकडून होणारे राजकारण दुर्दैवी
भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंट X वर पोस्टची सुरुवात अभिषेक घोसाळकरांच्या श्रद्धांजलीने केली आहे. पुढे त्यांनी ट्वीटमध्ये लिहिले की, अभिषेक घोसाळकरांच्या धक्कादायक मृत्यूचे उबाठा गटाकडून होणारे राजकारण दुर्दैवी आहे. कारण, सकृतदर्शनी या भयंकर घटनेत राजकारणाचा दुरान्वयानेही संबंध नाही. वैयक्तिक वैमनस्यातून ही घटना घडल्याचं प्राथमिक तपासात दिसून येतंय.
हेही वाचा : Ravindra Waikar & ED : अजूनही निष्ठा ‘मातोश्री’वरच… पण ईडीचा तुरुंगवास नको; रवींद्र वायकरांची व्यथा
मॅारिस आणि अभिषेक घोसाळकर यांचे चांगले संबंध होते. 2024 ला नवीन वर्षाच्या स्वागतासाठी दोघेजण एकत्र होते. ते दोघेही सोबत काम करत होते. मग घोसाळकरांसोबत स्वतःचाही जीव घेणाऱ्या मॉरिस नोरोन्हाकडून कुठल्या गोष्टीवरून इतकं टोकाचं पाऊल उचलण्यात आलं, याचा पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे. मात्र पिस्तुल कुठून आलं, लायसन्स मिळालं आहे का? या सर्व गोष्टी तपासून कडक कारवाई करणार असल्याचं आश्वासनही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. पण, संजय राऊत आणि उबाठा गटाचे नेते हीन राजकारण करून आणि पराकोटीची गलिच्छ भाषा वापरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करत आहेत असल्याचा आरोप भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी त्यांच्या पोस्टमधून केला आहे.
स्वार्थासाठी राजकारण करणाऱ्या उबाठा गँगला…
भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले की, तत्कालीन उबाठा सरकारची लक्तरेही आम्हाला वेशीवर मांडता येतील. त्यांच्या वसुलीबहाद्दर गृहमंत्र्यांच्या अकार्यक्षमतेची श्वेतपत्रिका प्रसिद्ध करता येईल. पण, ही ती वेळ नाही. राज्याची कायदा-सुव्यवस्था देवेंद्र फडणवीस नेतृत्वाखाली पोलीस चोखपणे सांभाळताहेत, म्हणून तर मोहोळ प्रकरणातील आरोपी ताबडतोब गजाआड झाले. परवाच पुण्यात सर्व गुंडांची झाडाझडती घेऊन त्यांना कठोर समज देण्यात आली आहे. कायदा हातात घेणाऱ्या स्वपक्षाच्या आमदारालाही त्यांनी तुरूंगाचे दरवाजे दाखवलेत. त्याच निःपक्षपाती भूमिकेतून घोसाळकर प्रकरणाचाही तपास होईल आणि सत्य जनतेसमोर येईल असाही विश्वास चित्रा वाघ यांनी व्यक्त केला. परंतु, स्वतःच्याच पक्षाच्या एका होतकरू तरूणाच्या मृत्यूचे स्वार्थासाठी राजकारण करणाऱ्या राऊत आणि उबाठा गँगला काय म्हणावे? हा खरा प्रश्न आहे अशा शब्दांत चित्रा वाघ यांनी खासदार संजय राऊत आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटावर निशाणा साधला आहे.