कोरोनाच्या दोन वर्षांच्या कालावधीनंतर राज्यात निर्बंधमुक्त सण-उत्सव साजरे करण्यात येत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर सण-उत्सवांवरील सर्व निर्बंध हटवले. त्यानंतर दहीहंडी, गणेशोत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला. त्यानंतर आता नवरात्रोत्सवही उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे दिवाळीतही अख्खी मुंबई उजळून निघणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे. (CM Eknath Shinde talk on navratri and diwali festival)
मुंबईत एका कार्यक्रमात बोलातना एकनाथ शिंदे यांनी दिवाळीही यंदा ठाण्यासोबतच मुंबईही विद्युत रोषणाईने उजळणार असल्याचे म्हटले. “अधिकाऱ्यांना विचारले, गणेशोत्सवात किती पैसे मिळतात, ते म्हणाले अगदी थोडे. मग, मी म्हणालो सोडून द्या, गणेश मंडळांना मंडपासाठीचे पैसे यंदा माफ झाले. आता, नवरात्रीही जोरात होईल. मी अधिकाऱ्यांना सांगितलेय, दिवाळीला अख्ख्या मुंबईत विद्युत रोषणाई करा, आम्ही आमच्या ठाण्यात करतो, आता अख्ख्या मुंबईत होणार”, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले.
येत्या काही महिन्यांत राज्यातील प्रमुख महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी सण व उत्सवांचा वापर जनसंपर्क वाढवण्यासाठी केल्याचे पाहायला मिळते. शिंदे यांनी गणेशोत्सव काळात अनेक मंडळांना भेट दिल्या. गणेशोत्सवामुळे नेते मंडळींना सर्वसामान्यांना भेटण्याची चांगली संधी मिळते. त्याचा पुरेपूर लाभ शिंदे यांनी घेतला. या कालावधीत शिंदे यांनी दररोज जवळपास 50 ते 60 मंडळांना भेटी दिल्या.
कोरोनाच्या दोन वर्षानंतर यंदा प्रथमच निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा करता आला. त्यामुळे, गणेशोत्सवानंतर आता नवरात्री आणि दिवाळीही मोठ्या उत्साहात आणि आपल्या लोकांसमवेत प्रत्येकाला साजरी करता येणार आहे. राज्यात काही महिन्यांपूर्वी महाविकास आघाडीचs सरकार कोसळलs आणि शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले. या सरकारने यंदा गणेशोत्सवाला परवानगी दिली. त्यासोबतच मुख्यमंत्री शिंदेंचा उत्सवातील सहभाग लक्षणीय ठरला आहे.
हेही वाचा – मुंबईतील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी साडेपाच हजार कोटींचा निधी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा