‘स्वाद भरे, सच्ची शक्ती भरे’ अशी ओळख असलेला पारले जी आता शहरासोबतच आता ग्रामीण भागातही आऊट ऑफ स्टॉक झाला आहे. पारले जी छोट्यातला छोटा बिस्किटाचा पुडाही मिळेनासा झाला आहे. कोरोनाच्या काळात शहरातील तसेच ग्रामीण भागातही पारले जी एक मोठा आधार अनेकांच्या रोजच्या लाईफस्टाईलचा भाग आहे. पण कोरोनाच्या परिणामामुळे पारलेजीचे पुडे आता सर्वसामान्यांना मिळेनासे झाले आहेत.
कोरोनाच्या संकटामुळे सध्या पारले जी च्या कंपनीत उप्तादन प्रक्रियेत काम करणारा अवघा ५० टक्के कर्मचारी वर्ग कार्यरत आहे. अनेक ठिकाणी कर्मचाऱ्यांच्या तुटवड्यामुळे उत्पादनावरही परिणाम झाला आहे. तर अनेक ठिकाणी पारले जी पॅकिंगसाठी लागणारा कच्चा माल उपलब्ध होत नसल्याने पॅकेजिंगच्या अडचणी येत आहेत. पॅकेजिंगसाठी लागणाऱ्या कच्च्या मालासाठी वाहतुकीवर मर्यादा आल्यानेच त्याचा परिणाम संपुर्ण साखळीवर होत आहे. परिणाम बिस्किटांची निर्मिती होत असली तरीही त्याचे पॅकेजिंग करणे शक्य होत नाही अशी सद्यस्थिती आहे. याआधीच पारले जी कंपनीकडून तीन कोटी बिस्किटे तीन आठवड्यात सरकारी एजन्सीला देण्यात येणार आहेत असे जाहीर केले होते. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात लोकांना मदत होईल असे कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले होते. पुरेसा बिस्किटचा साठा बाजारात उपलब्ध होईल असे कंपनीने स्पष्ट केले होते. पण मुंबई शहरासह आता ग्रामीण भागातही पारले जी मिळत नाही ही वास्तविकता आहे.
अनेकांना बिस्किटांचा साठा केल्याने आणि एकाचवेळी मोठ्या प्रमाणात पारले जी बिस्किट खरेदी केल्यामुळेही सध्या बाजारात बिस्किटांचा तुटवडा जाणवत आहे. कोरोनामुळे अनेक लोकांच्या रोजगारावर परिणाम होतानाच अनेकांच्या रोजच्या खाण्याचीही गैरसोय होत आहे. अशातच आता पारले जी चा आधारही या तुटवड्यामुळे हरवला आहे. अनेकांनी कोरोनाच्या आपत्कालीन काळातील मदत म्हणूनही या बिस्किटाची खरेदी केली आहे. त्यामुळेच आता बिस्किटाचा मोठा तुटवडा बाजारत सुरू झाला आहे.
हे ही वाचा – धक्कादायक! देशात कोरोनाच्या ५४९ नवीन रुग्णांची वाढ, आरोग्यसेवा सज्ज!