राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असून एकूण कोरोनाची लाट नियंत्रणात असल्याची माहिती
सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी दिली. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यपासून कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढली होती. त्यामुळे पुन्हा एकदा निर्बंध लावण्याची वेळ आली. मात्र निर्बंध लावल्यानंतर कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे. मागील काही दिवसांपासून राज्यात दररोज सरासरी ४० हजार कोरोना रुग्णांची नोंद होत होती. पण मंगळवारपासून रुग्णांच्या संख्येत उतार येत असल्याचे दिसू लागले आहे. गेल्या काही तासात एकाही ओमायक्रोनच्या रुग्णाची नोंद झाली नाही. असंही ते म्हणाले.
या पार्श्वभूमीवर राजेश टोपे यांनी आज माध्यमांशी संवाद साधताना राज्यातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगितले. फारच कमी रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज पडत आहे. कोरोना चाचण्यांच्या संख्येत वाढ करणे आणि जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण करण्यासाठी राज्य सरकार पूर्ण क्षमतेने काम करत आहे असल्याचे राजेश टोपे म्हणाले.
रुग्ण बरे होण्याचा दर ९४. ३२ टक्के
राज्यात आतापर्यंत ६८ लाख ६८ हजार ८१६ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.३२ टक्के आहे. सध्या राज्यात २३ लाख ४४ हजार ९१९ व्यक्ती गृहविलगीकरणात आहेत तर २ हजार ९६० व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात आहेत. राज्याचा कोरोनाचा मृत्यूदर १.९५ टक्के आहे, असेही टोपे यांनी सांगितले.