शिवसेनेचा दसरा मेळाला काल दसऱ्याच्या मुहूर्तावर पार पडला. या मेळाव्यादरम्यान राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपावर जोरदार निशाणा साधला. यानंतर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही आज मुख्यमंत्र्यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. आज ते नागपूरमध्ये प्रसार माध्यमांशी बोलत होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची राज्यघटना बदलण्याचे उद्धव ठाकरेंचे मनसुबे अशा कठोर शब्दात देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.
यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले, “काल माननीय मुख्यमंत्र्यांनी संघराज्य व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह उभं केलं आणि ही व्यवस्था बदलली पाहिजे असं सांगितलं. म्हणजे काय? भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं संविधानच बदलण्याचे मनसुबे त्यांनी काल बोलून दाखवले. काहीही झालं तरी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हे बदललं जाणार नाही, ते कोणी बदलू शकणार नाही. त्यामुळे काही कम्युनिस्ट लोकांना, डाव्या विचारांच्या लोकांना आणि काही पक्षांच्या सोबतीने संविधान बदलण्याचे छुपे अजेंडे, मनसुबे आम्ही कधीच पूर्ण होऊ देणार नाही”. असा इशारा फडणवीसांनी दिला आहे.
“मुख्यमंत्री होणे ही ठाकरेंची महत्त्वकांक्षा”
“आत्तातरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाबडेपणाच मुखवटा उतरवला पाहिजे आणि त्यांनी मान्य केले पाहिजे मुख्यमंत्री बनण्याची त्यांची महत्त्वकांक्षा होती आणि त्यांनी पूर्ण केली. राजकारणात महत्वाकांशा असणं चुकीचे नाही मात्र ती लपवून त्या मागून तत्वज्ञान उभं करण हे मात्र चुकीचे आहे. दिलेला शब्दचं जर पूर्ण करायचा होता तर शिवसैनिकाला मुख्यमंत्री करता आलं असतं. यात दिवाकर रावते, एकनाथ शिंदे, ,सुभाष देसाई होते. इतिहासात डोकावल्यावर लक्षात य़ेतं जर मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं तर राणेंना पक्षातून का बाहेर जावं लागलं? राणेंना काही पक्षप्रमुख व्हायचं नव्हत. राज ठाकरेंना पक्षातून का बाहेर जावं लागलं? त्यामुळे ठीक आहे तुमची महत्त्वकांक्षा होती ती तुम्ही पूर्ण केली पण त्याकरिता भाजपाला दोष देणं थांबवा.असही मुख्यमंत्री म्हणाले.
“महाराष्ट्राचा बंगाल होऊ देणार नाही”
मुख्यमंत्री म्हणाले की आम्हाला महाराष्ट्राचा बंगाल करायचाय, म्हणजे नक्की काय करायचंय? खंडणीबाजीमुळे बंगालमध्ये एकही उद्योग टिकलेला नाही. तुमच्या विरोधात जो बोलेल त्याचे हात पाय तोडून त्याला फासावर लटकवायचा असा महाराष्ट्र घडवायचा आहे का? आमच्यात जोवर रक्ताचा एक थेंब आहे तोवर आम्ही, महाराष्ट्राचा बंगाल होऊ देणार नाही. महाराष्ट्र महाराष्ट्रच राहील”. असही फडणवीस म्हणाले.