म्हाडा मुंबईकडून विविध पदांच्या भरतीसाठी परीक्षा आयोजित करण्यात आली होती. परंतु आयोजित करण्यात आलेली परीक्षा आज रदद् करण्यात आली आहे. त्यामुळे भाजपाने राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. ऐनवेळी परीक्षा रद्द केल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. पेपर फुटी प्रकरणी सीबीआय चौकशी झाली पाहीजे, अशी आमची मागणी असल्याचं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले.
या सरकारला एक परीक्षा धड घेता येत नाही!
सामान्य युवा प्रचंड त्रस्त आहे.
अधिकारी आणि मंत्री नामानिराळे राहतात!
मग दोषी कोण आहे?
याची सीबीआय चौकशी झाली पाहिजे!
माध्यमांशी संवाद…https://t.co/pmypmHiiQF pic.twitter.com/VS166EKM4n— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 12, 2021
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा फडणवीस म्हणाले की, पहिल्यांदा परीक्षा जाहीर करायच्या. त्यानंतर पेपरफुटीने त्या रद्द करायच्या. अशा प्रकारचा काळा कारभार सातत्याने चालला आहे. त्यामुळे एकही परीक्षा यांना नीट घेत येत नाही. मागे देखील आरोग्य विभागाच्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. परंतु त्यावेळी सुद्धा अशाच प्रकारचा घोळ झाला होता. आरोग्य विभागाच्या परीक्षा तीन वेळा रद्द करण्यात आल्या होत्या. पेपर फुटल्यामुळे त्याची तार मंत्रालयापर्यंत गेलेली आहे. त्यामुळे या परिक्षांमध्ये मोठा भ्रष्टाचार सुरू आहे.
पेपर रद्द झाल्यामुळे सामान्य युवकांमध्ये आक्रोश पहायला मिळत आहे. त्यामुळे या प्रकरणी सरकारने कडक कारवाई केली पाहीजे. भ्रष्टाचार आणि निर्लज्जतेचा कळस असं किती दिवस आणि किती वेळा सहन करायचे, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला आहे. तसेच आमची मागणी आहे की या सगळ्या प्रकरणाची आणि पेपरफुटीची सीबीआय चौकशी झाली पाहीजे. असे फडणवीस म्हणाले.
राज्यात सरकार नावाची यंत्रणा कार्यान्वित होणार आहे की नाही? असा प्रश्न उपस्थित करत आज पुन्हा लाखो विद्यार्थ्यांना मोठा फटका बसलाय. नोकरी देऊ शकत नसाल तर किमान त्यांची अशी थट्टा तरी करू नका, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
नक्की प्रकरण काय?
म्हाडा भरती प्रक्रियेतील परीक्षेमध्ये गोपनियतेचा भंग झाल्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. पण यापुढच्या परीक्षेची जबाबदारी म्हाडा घेणार असल्याची माहिती राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. म्हाडाची परीक्षा देणाऱ्या राज्यातील परीक्षार्थींची मी माफी मागतो असेही ते म्हणाले. तसेच येत्या काळात होणाऱ्या परीक्षेसाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही. असं जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं आहे.
हेही वाचा : Farmers Protest : शेतकरी आंदोलन मागे घेतल्यानंतर राकेश टिकैत यांचा १९ डिसेंबरला महाराष्ट्र दौरा