मुंबई : मुंबईसह ठाणे आणि पुणे शहरात हवेची गुणवत्ता खालावल्याने वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने सुमोटो याचिका दाखल करून याचिकेवर झालेल्या सुनावणीत सुनावणी करताना राज्य सरकारसह महापालिका प्रशासनाला चार दिवसांची अंतिम मुदत देत प्रदूषण रोखण्याचे निर्देश दिले होते. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर महापालिका प्रशासन आणि राज्य सरकार कामाला लागले असून, गुरुवारी (9 नोव्हेंबर) रोजी प्रदूषण रोखण्यासाठी सर्व विभागांचा आढावा घेतला. बैठकीनंतर तर माध्यमांशी संवाद साधला. (Efforts on war footing to curb pollution Chief Minister will hold a review meeting)
यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, आज सर्व विभागांचा आढावा घेतला. त्यामध्ये विविध सूचना देण्यात आल्या. ते म्हणाले की, हजारो टॅंकरच्या पाण्याने मुंबईतील रस्ते धुवावे, आवश्यकता भासल्यास अन्य फॉगर्ससुद्धा वापरावे. जे जे आवश्यक आहे ती सगळी मशिनरी वापरण्याच्या सूचना दिल्या आहेत. राज्यातील सर्व महापालिका, आयुक्तांना, जिल्हाधिकाऱ्यांना सूचित केले आहे. आणि पर्यावरण विभागाला सांगितले आहे की, डेली मॉनिटरींग करा, कारण, तत्काळ हे प्रदूषण कमी झाले पाहीजे. त्यासाठी शहरी भागासाठीही सूचना दिल्या आहेत. शहरातसुद्धा झाडे लावण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
हेही वाचा : …आणि आज शेवटी हे सिद्ध झालेच, आदित्य ठाकरे यांचे मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर टीकास्त्र
मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करू
पुढे बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, वाढते प्रदूषण कमी करण्यासाठी युद्ध पातळीवर कामे करा अशा सूचना देण्यात आल्या आहेत. त्याची अंमलबजावणीसुद्धा केली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळेल. सोबतच मुंबई उच्च न्यायालयाने ज्या सूचना दिल्या आहेत त्यांचे शंभर टक्के तंतोतंत पालन केले जाणार आहे. पर्यावरण विभागाच्या ज्या गाईड लाईन्स आहेत त्या लागू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यातून लवकरच आपल्याला दिलासा मिळेल.
हेही वाचा : Maharashtra Politics : कॅबिनेटमध्ये गँगवॉर; राऊतांच्या वक्तव्यावर नितेश राणे म्हणतात…
सोने- चांदी गलाईच्या कारखान्यावर कारवाई
मुंबईतील वायू प्रदूषण रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने कडक पाऊले उचलली आहेत. प्रदूषणाला कारणीभूत काळबादेवी, झवेरीबाजार, भुलेश्वर परिसरात सोने- चांदी गलाईच्या कारखाने आहेत. मात्र, पालिकेने सोमवारी (6 नोव्हेंबर) चार भट्ट्या व धुरांड्यांवर कारवाई करून ते हटविले आहेत. त्यामुळे या परिसरातील इतर सोने-चांदी गलाई व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.