माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करत भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. एकनाथ खडसे यांनी शुक्रवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. दरम्यान शनिवारी एकनाथ खडसे यांनी माध्यमांशी बोलताना असे म्हटले की, “अनेकांना भाजपा सोडण्याची इच्छा आहे आणि त्यांना रोखण्यासाठी पार्टीकडून सांगितले जात आहे की, राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार कोसळणार आहे. मात्र, राज्य सरकार पडणार नाही हे नक्की”
Many people want to leave BJP and to stop them the party says the government (in Maharashtra) is going to collapse, but the government is not going to fall: Eknath Khadse, who joined NCP yesterday after quitting from BJP pic.twitter.com/M2sYwpNfId
— ANI (@ANI) October 24, 2020
पक्षप्रवेशावेळी खडसेंनी पवारांना दिले वचन
पक्षप्रवेशाच्या वेळी बोलताना खडसे म्हणाले, “शरद पवार साहेब, मी तुम्हाला शब्द देतो की मी गेली ४० वर्षे ज्या निष्ठेने भाजपाचे काम केले, त्याच निष्ठेने मी यापुढे राष्ट्रवादी काँग्रेसचे काम करेन. मी भाजपा पक्ष वाढवला, तसाच आता राष्ट्रवादी पक्ष दुप्पट वेगाने वाढवेन. मी पक्षाचा विस्तार करून दाखवेन. मला फक्त तुम्हा लोकांची साथ हवी आहे. माझ्या पाठीशी जर कोणी भक्कमपणे उभं राहिलं, तर मी कुणालाही घाबरत नाही!” तसेच, राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची कार्यकर्त्यांची इच्छ होती आणि दिल्लीतील भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनीही मला तसाच सल्ला दिल्याचे खडसे म्हणाले.
पक्ष सोडणं माझी इच्छा नव्हती, पण…
यासह ते असेही म्हणाले, पक्ष सोडणं माझी इच्छा नव्हती, पण ती कार्यकर्त्यांची भावना होती की आता भाजप सोडलं पाहिजे. कार्यकर्त्यांची इच्छा होती राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जायची. इतर पक्षांच्याही मला ऑफर होत्या. दिल्लीतल्या वरिष्ठांशी देखील मी चर्चा केल्यानंतर त्यांनी सांगितलं की आता तुम्हाला भाजपमध्ये भवितव्य नाही. दिल्लीतल्या वरिष्ठांनीही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जायला सांगितलं. भाजपमध्ये बरेच लोकं आहेत जे कंटाळले आहेत. पण ते बोलू शकत नाहीयेत. मोठ्या पदावर असलेल्या लोकांनाही वाटतंय. पण ईडीची भिती वाटतेय. पण आता नाथाभाऊची ताकद काय आहे, हे मी पुढच्या काळात जळगावमध्ये कार्यक्रम घेऊन तुम्हाला दाखवून देईन.