काँग्रेसच्या विधानसभा अध्यक्ष बदलाच्या निणर्यावरून शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून आज नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. काँग्रेसला विधानसभा अध्यक्षपद दिलं ते पाच वर्षांसाठी. फक्त एका वर्षात राजीनामा देऊन नव्याने निवडणूक घेण्यासाठी नाही. ते काही असलं तरी यातून मार्ग काढावा लागेल. काँग्रेसने त्यांच्या पक्षांतर्गत बदल केला हा त्यांचाच अधिकार; पण सरकार, विधानसभा, बहुमताचा आकडा यावर त्या निर्णयाचा परिणाम होणार नाही यासाठी सावधान राहावे लागेल, असं आव्हान सामनातून केलं आहे.
काँग्रेसला नवा प्रदेशाध्यक्ष मिळत आहे, त्याच बरोबर विधानसभेला नवा अध्यक्ष मिळेल. नाना पटोले हे विधानसभा अध्यक्षपदावरुन गेले, पण काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून राज्याच्या मुख्य प्रवाहात परत आले. म्हणजे नाना गेले, नाना आले, असं म्हणत नाना पटोलेंना सामनाच्या अग्रलेखातून शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
सामनाच्या अग्रलेखात नेमकं काय लिहिलं आहे?
नाना हे शेतकरी, कष्टकऱ्यांचे नेते आहेत आणि त्यांचा पिंड हा घटनात्मक चौकटीच्या पिंजऱ्यात बसून काम करणाऱ्यांचा नाही. त्यामुळेच विधानसभा अध्यक्षांचा सुवर्ण पिंजरा सोडून ते पक्ष संघटनेत येत आहेत. काँग्रेसच्या दिल्लीतील हायकमांडने हा निर्णय विचार करूनच घेतला आहे. राष्ट्रीय पातळीवर काँग्रेसला कायमस्वरुपी अध्यक्ष अद्यापी मिळू शकला नाही. गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा यांच्या पुढाकाराने २३ नेत्यांनी काँग्रेसला अध्यक्ष द्या, अशी मागणी केलीच आहे. अहमद पटेल यांच्यासारखा मोहरा अल्लास प्यारा झाला आहे. त्यामुळे समन्वयाची भूमिका बजावणारा नेता कोण? हा प्रश्न आहेत. ही पोकळीसुद्धा हायकमांड लवकरच भरून काढेल असे दिसते. नाना पटोले यांच्या बाबातीत तातडीने निर्णय घेताना आता विधानसभा अध्यक्षपदासाठी पुन्हा निवडणूक घ्यावी लागेल याचाही विचार काँग्रेसच्या हायकमांडने केलाच असेल. कारण विधानसभा अध्यक्षपदासाठी आता पुन्हा निवडणूक घ्यावीच लागेल आणि पुन्हा एकदा आकड्यांची जुळवाजुळव नव्याने करावी लागले. बहुमताचा आकडा नक्कीच आहे. त्याची चिंता करण्याचे कारण नाही, पण आघाडी सरकारात अशा घटनात्मक पदांसाठी शक्यतो पुनः पुन्हा निवडणुका टाळणे सगळ्यांच्याच हिताचे ठरत असते. विरोधकांनी बेडकी कितीही फुगवली तरी त्यांचा बैल होणार नाही हे खरेच, पण तरीही त्यांना हाकारे, उकारे, आरोळ्या ठोकण्याची संधी का द्यावी? अशा शब्दात ‘सामना’च्या अग्रलेखातून महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर भाष्य करण्यात आलं आहे.
हेही वाचा – राज्यपालांनी कोश्यारी यांनी आता अंत पाहू नये