केंद्र सरकारने आणलेल्या ३ वादग्रस्त कृषी कयाद्यांना विरोध करत गेल्या ६ महिन्यांपासून पंजाब, हरियाणाचे शेतकरी दिल्लीच्या सीमेवर तळ ठोकून बसले आहे. या आंदोलकारी शेतकऱ्यांना काँग्रेससह देशातील १२ विरोधी पक्षांनी पुन्हा पाठिंबा दर्शवला आहे. संयुक्त किसान मोर्चाला पाठिंबा दर्शवण्यात आले असल्याचे पत्र काँग्रेसकडून जारी करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी सुरु केलेल्या आंदोलनाला २६ मे रोजी ६ महिन्यांचा कालावधी पुर्ण होत आहे. यामुळे २६ मे रोजी देशभरातून केंद्र सरकारविरोधात निषेध करण्यात येणार आहे. या आंदोलनाला देशातील १२ विरोधी पक्षांनी पाठिंबा दिला आहे. काँग्रेस नेते आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे.
काँग्रेससह देशातील १२ विरोधी पक्षांनी संयुक्त किसान मोर्चाला पाठिंबा दिले असल्याचे पत्र जारी करण्यात आले आहे. या पत्रावर काँग्रेसचा हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना प्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह १३ विरोधी पक्षनेत्यांच्या सह्या आहेत. या पत्रामध्ये १२ मे रोजी विरोधी पक्षांकडून केंद्र सरकारला लिहिलेल्या पत्राचा उल्लेख करण्यात आला आहे. त्या पत्रात म्हटले होते की, कृषी कायदे मागे घेण्याची विनंती करण्यात आली होती. जेणेकरुन सीमेवर असणाऱ्या शेतकरी पुन्हा आपल्या राज्याती परततील आणि देशासाठी पुन्हा शेती करण्यास सुरुवात करतील. तसेच त्यांना कोरोनाच्या संकटातून वाचवता येऊ शकते.
केंद्र सरकारला लिहिलेल्या पत्रात तीन कृषी कायदे रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. स्वामिनाथन आयोगाने सुचवलेल्या सी २ + ५० टक्के एमएसपी हमी देण्याची मागणी केली आहे. केंद्र सरकारने संयुक्त किसान मोर्चासोबत चर्चा करुन शेतकरी आंदोलन तात्काळ थांबवले पाहिजे असेही या पत्रात म्हटले आहे.
We extend our support to the call given by the Samyukta Kisan Morcha (SKM) to observe a countrywide protest day on May 26, marking the completion of six months of the heroic peaceful Kisan struggle.
– Joint Statement by 12 Major Opposition Parties pic.twitter.com/q256H5U3b0
— Balasaheb Thorat (@bb_thorat) May 23, 2021
संयुक्त किसान मोर्चाला या १२ विरोधी पक्षांचा पाठिंबा
१. सोनिया गांधी ( काँग्रेस)
२. एचडी देवेगौडा (जद-एस)
३. शरद पवार (राष्ट्रवादी काँग्रेस)
४. ममता बॅनर्जी( टीएमसी)
५. उद्धव ठाकरे (शिवसेना)
६. एमके स्टॅलिन (डीएमके)
७. हेमंत सोरेन ( झामुमो)
८. फारुक अब्दुल्ला (जेकेपीए)
९. तेजस्वी यादव ( आरजेडी)
१०. अखिलेश यादव (समाजवादी पार्टी)
११. डी राजा (सीपीआई)
१२ सीताराम येचुरी (सीपीआय-एम)
शेतकरी आंदोलनाला ६ महिने पुर्ण
केंद्र सरकारने आणलेल्या ३ वादग्रस्त कृषी कायद्यांविरोधात देशातील शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाला २६ मे रोजी ६ महिने पुर्ण होतील. २६ सप्टेंबर रोजी संयुक्त किसान मोर्चा काढण्यात आला होता. तेव्हापासून पंजाब हरियाणाचे शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. यामध्ये अनेक शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. कडाक्याच्या थंडीत आणि कोरोनाच्या संकटातही हे शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत.