राज्यातील शासकीय आरोग्य संस्थांमध्ये ‘नि:शुल्क प्रयोगशाळा चाचणी निदान योजना’ सुरु करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत गेल्या वर्षभरात जवळपास ८० लाख रुग्णांच्या सुमारे १०० विविध प्रकारच्या अशा एकूण १ कोटी ८२ लाख वैद्यकीय चाचण्या मोफत करण्यात आल्या. राज्यातील २३१५ आरोग्य संस्थांमध्ये ही सेवा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. विविध आजारांच्या निदानासाठी रक्त, मुत्र, थूंकी तपासणी यांसारख्या प्रयोगशाळा चाचण्याची आवश्यकता असते. या चाचण्या करण्यासाठी येणारा खर्च पाहता सर्वसामान्य नागरिकांना कुठल्याही प्रकारचे शुल्क भरावे लागू नये, यासाठी गेल्यावर्षी राज्य शासनाने एचएलएल लाईफ केअर संस्थेसोबत करार केला. त्यानुसार आजही राज्यभरात विविध आरोग्य निदान चाचण्या मोफत केल्या जात आहेत.
या मोफत चाचण्यांचा समावेश
प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर २५ प्रकारच्या चाचण्या मोफत केल्या जातात. ग्रामीण रुग्णालय, उप जिल्हा रुग्णालयाच्या ठिकाणी ३२, उपजिल्हा रुग्णालय (१०० खाटांपेक्षा अधिक), महिला रुग्णालय, सामान्य रुग्णालय, जिल्हा रुग्णालय, मनोरुग्णालय आणि विभागीय संदर्भ रुग्णालयात ४६ प्रकारच्या चाचण्या तर ६ प्रकारच्या विशेष चाचण्या या प्रकल्पांतर्गत केल्या जात आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने मधुमेह, रक्ताशी संबंधीत विविध चाचण्या (हिमॅटोलॉजी), थॉयराईड, मलेरिया, मायक्रोबायोलॉजी आदी विविध प्रकारच्या चाचण्या केल्या जातात.
हजारो आरोग्य संस्थांमध्ये सोय
प्राथमिक आरोग्य केंद्र – १,८१८
ग्रामीण रुग्णालय – ४२३
जिल्हा रुग्णालय – ७४
आतापर्यंत ३५ जिल्ह्यांमध्ये सुमारे ८० लाख रुग्णांच्या नि:शुल्क प्रयोगशाळा चाचण्या करण्यात आल्या असून सुमारे १ कोटी ८२ लाख ५२ हजार ३६७ विविध प्रकारच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत, असे आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
वर्षभरात ८० लाख रुग्णांच्या विविध चाचण्या मोफत केल्या गेल्या. आरोग्य संस्थांच्या स्तरावर कलेक्शन केलेले सॅम्पलचे अहवाल संबंधित आरोग्य संस्थेच्या ई-मेल आयडीवर उपलब्ध करुन दिले जातात. तसेच चाचणीच्या रिपोर्टसच्या प्रत संबंधित आरोग्य संस्थेच्या अधिकाऱ्याकडे दिल्या जातात. या उपक्रमामुळे सामान्यांना शासकीय आरोग्य संस्थेमध्येच प्रयोगशाळा चाचणीची सोय उपलब्ध झाल्याने त्यांना दुसरीकडे जावे लागत नाही. त्यामुळे त्याचा वेळ आणि खर्चात बचत होते.– एकनाथ शिंदे, आरोग्यमंत्री