वीज बिले आणि वीज कनेक्शन कापण्याच्या प्रकारावरुन भाजप आक्रमक झाली आहे. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडून वारंवार वीज बील भरण्याची विनंती करण्यात येत आहे. महावितरण मोठ्या तोट्यात असल्यामुळे सक्तीने वीज बील भरण्यास सांगत आहेत. तसेच ज्यांची बिले थकीत आहेत त्यांची वीज खंडीत करण्यात येत यावरुन भाजप नेते गिरीश महाजन यांनी महाविकास आघाडी सरकारविरोधात आंदोलन केले होते. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकार म्हणजे एक आंधळा, एक बहिरा, एक मुका अशी महात्मा गांधी यांची तीन माकडे आहे अशी टीका गिरीश महाजन यांनी केली आहे. राज्यातील शेतकऱ्यांचे शेतीच्या हंगामात वीज कनेक्शन कापण्यात येत असल्यामुळे मोठं नुकसान होत आहे.
भाजप नेते गिरीश महाजन यांनी महाविकास आघाडी सरकारविरोधात आंदोलन केले. यावेळी महाजन यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. राज्य सरकारला शेतकऱ्यांचे काही घेणेदेणे नाही. कॅबिनेटमध्ये सरकारची स्वतःमध्येच मारामारी सुरु आहे. महाविकास आघाडी सरकार म्हणजे एक आंधळा, एक बहिरा आणि एक मुका असे गांधीजींचे तीन बंदर आहेत अशी टीका गिरीश महाजन यांनी केली आहे. राज्यात परीक्षेचा गोंधळ, एसटी कर्मचाऱ्यांचा संप तर दुसरीकडे भ्रष्टाचार असून मुख्यमंत्र्यांनी हौस करुन घेतली आहे. मागील दोन वर्षांमध्ये मुख्यमंत्री कुठे होते? असा प्रश्न गिरीश महाजन यांनी केला आहे.
खडसेंवर महाजनांची टीका
भाजप नेते गिरीश महाजन यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे याच्यावर टीकास्त्र डागलं आहे. याची युती होती आणि त्याची युती होती करण्यापेक्षा आपल्या मनगटात जोर पाहिजे अशी टीका भाजप नेते गिरीश महाजन यांनी खडसेंवर केली आहे. नगरपंचायत निवडणुकीमध्ये भाजपने शिवसेनेसोबत युती केल्याचा आरोप खडसेंनी केला होता. यावर महजानांनी पलटवार केला आहे. तुम्ही विधानसभा निवडणूक हारलात, कोथळी ग्रामपंचायतीमधील ४ सदस्य सोडून गेले, मुक्ताईनगरमध्ये नगराध्यक्ष नाही आता बोदवड पण हातून गेलं आहे. त्यामुळे तुमचं तुम्ही बघा आणि भाजपची काळजी करु नका, राष्ट्रवादी जिवंत ठेवा असा घणाघात गिरीश महाजन यांनी खडसेंवर केला आहे.