घरमहाराष्ट्रखूषखबर! गेल, विटारा, रिलायन्सकडून राज्यात १० हजार नोकर्‍या

खूषखबर! गेल, विटारा, रिलायन्सकडून राज्यात १० हजार नोकर्‍या

Subscribe

राज्यात १६ हजार ५०० कोटींचे उद्योग करार

राज्यासह देशात कोरोनाच्या संकटाने सर्वच क्षेत्राचे कंबरडे मोडले असताना महाराष्ट्राने याही काळात उद्योग क्षेत्रात चांगली उचल घेतली आहे. मंगळवारी रिलायन्स सायन्सेस, गेल इंडिया आणि पर्यायी इंधन बनवणार्‍या विटारा एनर्जी या कंपन्यांबरोबर उद्योग विभागाने सामंजस्य करार करून राज्यात १६ हजार ५०० कोटींची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. या उद्योगांशी झालेल्या करारावेळी राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई उपस्थित होते.

करार करण्यात आलेल्या कंपन्यांपैकी गेल इंडिया रायगड जिल्ह्यातील उसर येथे प्रकल्पाचा विस्तार करणार असून येथे सुमारे आठ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. येथील प्रकल्पात एलपीजी निर्मिती व वितरण, एलएनजी वायू पुनर्भरण, पेट्रोकेमिकल आदींची निर्मिती केली जाणार आहे. या प्रकल्पासाठी अमेरिकेतील आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. २०२५ पर्यंत हा प्रकल्प कार्यान्वित होईल, अशी माहिती कंपनीचे संचालक मनोज मेश्राम यांनी दिली. या ठिकाणी ३०० वरिष्ठ अधिकार्‍यांची नियुक्ती केली जाईल तसेच पाच हजार जणांना कामगारवर्गात रोजगार मिळणार आहे.

- Advertisement -

ऑस्ट्रेलियातील विटारा एनर्जी लिमिटेड कंपनीसोबत दुसरा करार करण्यात आला. किमान कार्बन तंत्रज्ञानाचा वापर करून नैसर्गिक वायू निर्मितीसाठी ही कंपनी प्रसिद्ध आहे. यवतमाळ जिल्ह्यात कंपनी प्रकल्प सुरू करणार आहे. जैव इंधन निर्मितीसोबत हायट्रोजन, रिनेवबल डिझेल, एव्हिएशन फ्युअल, बायो सीएनजी, इथेनॉल निर्मिती आदी क्षेत्रात काम करणार आहे. पर्यावरण पूरक आणि सर्वांसाठी किफायतशीर उत्पादने निर्माण केली जातील, असा विश्वास कंपनीच्या प्रतिनिधींनी व्यक्त केला. या प्रकल्पासाठी साडेआठ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार असल्याचे कंपनीचे कार्यकारी संचालक क्लिव स्टिफन्स यांनी स्पष्ट केले. यावेळी कंपनीचे संचालक आणि सीईओ सुभाष बोस उपस्थित होते. २०२२ पर्यंत हा प्रकल्प कार्यान्वित होणार आहे.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मॅग्नेटिक महाराष्ट्र संकल्पनेला आजच्या सामंजस्य करारातून खर्‍या अर्थाने हातभार लागला आहे. देश-विदेशातील गुंतवणूकदारांनी यापूर्वी तीन टप्प्यांत राज्य शासनासोबत सुमारे १ लाख १२ हजार कोटींचे करार केले आहेत. त्याचाच पुढील टप्पा म्हणून आज १६ हजार ५०० कोटींचे गुंतवणूक करार करण्यात आले. गेल इंडिया व विटारा कंपनीच्या गुंतवणुकीमुळे हरित ऊर्जा निर्मितीला चालना मिळेल. याशिवाय राज्याच्या औद्योगिक प्रगतीस हातभार लागेल, असा विश्वास उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी यावेळी व्यक्त केला. एमआयडीसीचे मु्ख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अन्बलगन यांनी राज्य शासनाच्यावतीने सामंजस्य करारावर स्वाक्षर्‍या केल्या. यावेळी उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे, उद्योग विभागाचे सचिव बलदेव सिंह यांच्यासह एमआयडीसीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -