घरमहाराष्ट्रनिर्बंध घातल्याने विचार स्वातंत्र्याची गळचेपी होणार - अशोक चव्हाण

निर्बंध घातल्याने विचार स्वातंत्र्याची गळचेपी होणार – अशोक चव्हाण

Subscribe

पुणे विद्यापीठाने २६ जुलै रोजी काढलेल्या परिपत्रकात सदरहू प्रतिबंध लादण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर अशोक चव्हाण यांनी सरकारवर टीका केली आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वसतीगृहातील विद्यार्थ्यांना सरकारविरोधी चळवळींमध्ये सहभागी होण्यास निर्बंध घातल्याने विचार स्वातंत्र्याची गळचेपी होणार असून, ही सरकारचीच दडपशाही असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केला आहे. पुणे विद्यापीठाने २६ जुलै रोजी काढलेल्या परिपत्रकात सदरहू प्रतिबंध लादण्यात आले आहेत. यासंदर्भात तीव्र आक्षेप नोंदवताना चव्हाण म्हणाले की, ‘या परिपत्रकानुसार विद्यार्थ्यांना कोणत्याही राजकीय चळवळीत किंवा सरकारविरोधी घडामोडींमध्ये सहभागी होण्यास बंदी घातली गेली आहे. विद्यार्थ्यांकडून तसे हमीपत्रही लिहून घेतले जाणार असून, या निर्बंधांचे उल्लंघन झाल्यास विद्यार्थ्यांना वसतीगृहाबाहेर काढले जाणार आहे. हा प्रकार म्हणजे सरकारविरोधी मतप्रवाह दडपून टाकण्याचा सरकारचाच नियोजनबद्ध कट आहे. या सरकारला भाजप वगळता अन्य कोणतीही विचारधारा बळकट होऊ द्यायची नाही.’

विद्यार्थ्यांवरील प्रतिबंध मागे घ्या – अशोक चव्हाण

विद्यापीठे ही नेहमीच राजकीय नेतृत्वाचे उगमस्थान आणि वैचारिक मंथनाची केंद्रे राहिली आहेत. त्यामुळे भाजपच्या भूमिकेला विरोध करणारा राजकीय मतप्रवाह विद्यापिठाच्या स्तरावरच खोडून टाकण्यासाठी हे निर्बंध लादले गेल्याचा आरोप अशोक चव्हाण यांनी केला. भारतीय संविधानाने नागरिकांना विचार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले आहे. मात्र या संवैधानिक अधिकारांचा वापर करणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या परिपत्रकानुसार वसतीगृह प्रवेशाला मुकावे लागेल. विद्यापिठाचे बहुतांश विद्यार्थी हे १८ वर्षांहून अधिक वयाचे म्हणजेच मताधिकार प्राप्त झालेले नागरिक असतात. या पार्श्वभूमीवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाने लादलेले हे प्रतिबंध संविधानाने दिलेल्या अधिकारांचे हनन करणारे आहे. त्यामुळे संबंधित परिपत्रक तातडीने मागे घेण्याची मागणी चव्हाण यांनी केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – पीकविम्यासाठी मोर्चा हा शिवसेनेचा ‘स्टंट’- अशोक चव्हाण

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -