घरमहाराष्ट्रमुंबईतील करोना चाचण्या विश्वासार्ह नाही ?

मुंबईतील करोना चाचण्या विश्वासार्ह नाही ?

Subscribe

पत्रकारांच्या चाचणीनंतर सोमय्यांनी उपस्थित केली शंका

करोना रुग्णांवर करण्यात येणार्‍या चाचण्यांबाबत आधीच शंका उपस्थित होत असताना पॉझिटिव्ह असलेल्या पत्रकारांना निगेटिव्ह आल्याने घरी पाठवल्यामुळे हा संशय अधिकच बळावला आहे. त्यामुळे करोनाबाबत केल्या जाणार्‍या चाचण्यांबद्दलच्या विश्वासार्हतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पत्रकारांच्या या चाचण्यांबाबत शंका उपस्थित करताना काही महत्त्वाच्या मुद्दांना हात घालत महापालिकेकडून स्पष्टीकरण मागवले आहे. त्यामुळे करोनाच्या चाचण्यांबाबतची शंका आता अधिक दृढ झालेली असून लोकांनी आता या चाचण्यांवर विश्वास कसा ठेवायचा असा प्रश्न निर्माण झालेला आहे.

मुंबईत करोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असतानाच त्याचे वृत्तांकन करताना याची बाधा होण्याची शक्यता लक्षात घेता टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशनच्या मागणीनुसार १७ एप्रिल रोजी पत्रकारांची चाचणी करण्यात आली. यामध्ये एकूण १६७ पैकी ५३ पत्रकारांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यामुळे २० एप्रिल रोजी या पॉझिटिव्ह पत्रकारांना गोरेगावमधील फर्न हॉटेलमध्ये ठेवण्यात आले. त्यानंतर या पत्रकारांची दुसरी चाचणी करण्यात आली. यामध्ये यांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना रविवारी २६ एप्रिल रोजी घरी पाठवण्यात आले. त्यामुळे भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी काही मुद्दे उपस्थित करत हे पत्रकार जर पॉझिटिव्ह होते तर त्यांना आयसोलेशन कक्षात का ठेवण्यात आले नाही. त्यांना हॉटेलमध्ये क्वारंटाईन का करण्यात आले होते, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

- Advertisement -

विशेष म्हणजे या पॉझिटिव्ह रुग्णांवर कोणत्याही प्रकारचा औषधोपचार करण्यात आला नाही. तर एका दिवसात त्यांचे अहवाल निगेटिव्ह कसे आले, असा सवालही किरीट सोमय्या यांनी केला आहे. जर या पत्रकारांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते, तर त्यांच्या कुटुंबातील निकटच्या संपर्कातील तसेच कुटुंबातील लोकांना क्वारंटाईन किंवा आयसोलेशन कक्षात पाठवून का चाचणी केली नाही. त्यामुळे ही चाचणी कोण करते आणि त्यांची विश्वासार्हता काय आहे,असा प्रश्न सोमय्या यांनी उपस्थित केला आहे. आज या पत्रकारांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने यातील काहींना मानसिक धक्का बसला होता.

यामुळे यापैकी कुणाला हृदयविकाराचा तीव्र झटका आला असता तर याला जबाबदार कुणाला धरले असते, असाही प्रश्न सोमय्या यांनी उपस्थित केला आहे. विशेष म्हणजे करोनाची बाधा झालेल्यांच्या संपर्कातील व्यक्तीला क्वारंटाईनमध्ये पाठवण्यात आल्यानंतर त्यांना तिथे १४ दिवस ठेवणे बंधनकारक आहे. मग पहिला अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर आठ दिवसांत दुसरा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना क्वारंटाईन कालावधी पूर्ण करण्यापूर्वीच घरी पाठवणे हा नियमांचा भंग आहे. त्यामुळे याबाबत किरीट सोमय्या यांनी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे तसेच महापालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांच्याकडे या सर्व मुद्यांबाबतचे स्पष्टीकरण मागवले आहे.आपण काढलेला निष्कर्ष तथा नोंदवलेल्या अनुमानाबाबत सरकार तसेच पालिकेनेही आपला अभ्यास अहवाल योग्य असून त्याचा विचार केला जाईल, असे उत्तर दिल्याचे सोमय्यांनी म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -