सामनामध्ये संजय राऊत यांनी २६ डिसेंबरला लिहलेल्या अग्रलेखाचे कात्रण मी जपून ठेवले आहे. मी त्यांच्यावर खटला दाखल करुन त्यांना पुन्हा तुरुंगात पाठवेन, असा इशारा केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी दिला. त्यामुळे पुन्हा एकदा आता नारायण राणे आणि संजय राऊत यांच्यातील वाद आणखीनच चिघळण्याची शक्यता आहे. (I Will Send Back Sanjay Raut In Jail Says Bjp Union Minister Narayan Rane In Maharashtra)
केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी शुक्रवारी कणकवली पर्यटन महोत्सवाला हजेरी लावली होती. त्यावेळी नारायण राणे या महोत्सवाच्या व्यासपीठावरत बोलत होते. त्यावेळी नारायण राणे यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला.
काय म्हणाले नारायण राणे?
“मी २६ डिसेंबरच्या अग्रलेखाचे कात्रण जपून ठेवले आहे. ते कात्रण मी माझ्या वकिलांकडे पाठवले आहे. मी वाचून विसरणार नाही, दखल घेणार आहे. प्रत्येक गोष्ट आणि वाक्य माझ्या लक्षात राहते. हा माझा वाईट स्वभाव आहे. त्यामुळे संजय राऊतांनी लिहलेला २६ डिसेंबरचा अग्रलेखही माझ्या लक्षात आहे. मी संजय राऊत यांना सोडणार नाही. मी त्यांच्याविरोधात न्यायालयात खटला दाखल करेन. संजय राऊत १०० दिवस आर्थर रोड तुरुंगात राहिले. ते त्यांना कमी वाटत असावेत. त्यामुळे राऊतांना पुन्हा तुरुंगात जावेसे वाटत असेल. मी त्यांच्या तुरुंगात परत जाण्याचा रस्ता मोकळा करतोय”, अशा शब्दांत नारायण राणे यांनी संजय राऊतांवर हल्लाबोल केला.
दरम्यान, नारायण राणे यांच्यापूर्वी शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर आणि शंभुराज देसाई यांनीही संजय राऊत यांना पुन्हा तुरुंगात टाकण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे आता या सगळ्यावर खासदार संजय राऊत काय प्रतिक्रिया देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
हेही वाचा – ‘चित्रपट उद्योग हलवा नाही की, डब्यात घालून…’; चित्रनगरीच्या राजकारणाला मनसेचा विरोध