मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी भाजपचे आमदार ॲड. आशिष शेलार यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याबाबत गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांना पत्र लिहिलं आहे. ॲड. आशिष शेलार यांनी ४ डिसेंबरला पत्रकार परिषदेत महापौर यांच्याविषयी बोलताना आक्षेपार्ह वक्तव्य केलं. यासंदर्भात किशोरी पेडणेकर यांनी दिलीप वळसे पाटलांना पत्र लिहिलं आहे.
ॲड. आशिष शेलार यांनी वरळीमध्ये झालेल्या सिलिंडर स्फोट प्रकरणी ४ डिसेंबर रोजी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत ‘सिलिंडर स्फोटात ७२ तासानंतर मुंबईचे महापौर पोहोचतात. एवढे तास कुठे निजला होतातट असं वक्तव्य केलं. यावर महापौरांनी आक्षेप घेत पोलिसात तक्रार दाखल करणार आहेत. यासंदर्भात त्यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना पत्र लिहिलं आहे.
काय म्हटलंय महापौरांनी?
मंगळवार, दि. ३० नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी वरळी येथील बी.डी.डी. चाळीत गॅस सिलेंडर्सचा स्फोट होऊन एकाच कुटुंबातील चौघेजण गंभीररित्या जखमी झाले. त्यांना नायर रुग्णालयामध्ये तातडीने उपचारार्थ दाखल करण्यात आले. यावेळी ४ महिन्यांच्या बालकाची प्रकृती गंभीर असल्याने बाळ दगावले व तदनंतर वडीलांचे निधन झाले. सदर घटनेबाबत, दि. ४ डिसेंबर २०२१ रोजी माननीय आमदार आशिष शेलार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ‘सिलिंडर स्फोटात ७२ तासानंतर मुंबईचे महापौर पोहोचतात, एवढे तास कुठे निजला होतात’ असे वक्तव्य केले.
मुंबईचे महापौर प्रथम नागरिक असून ते अत्यंत महत्त्वाचे पद आहे. महिला महापौर असताना माझ्याबाबत उदगारलेले शब्दप्रयोग आक्षेपार्ह आहे. आशिष शेलार यांनी केलेल्या वक्त्याचा मी निषेध व्यक्त करीत असून त्यांनी जो शब्दप्रयोग केला आहे त्यामुळे माझा व समस्त स्त्री जातीचा अवमान केला आहे. यास्तव मी त्यांच्या विरोधात पोलीसात तक्रार नोंदवित आहे.