मतदारांना जागृत करुन मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी राज्यात माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या रिजनल आऊटरिच ब्यूरोव्दारे महा मतदार जनजागृती अभियानाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती नवी दिल्लीचे ब्यूरो ऑफ आऊटरीच कम्यूनिकेशनचे महासंचालक सत्येंद्र प्रकाश यांनी दिली. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात मतदार जनजागृती मोहिमेंतर्गत फिरते चित्रवाहन तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते.
राज्यातील विविध जिल्ह्यात जनजागृती मोहिम
जिल्हाधिकारी नवल किशोर राम म्हणाले की, जिल्हयात स्वीप उपक्रमांतर्गत मतदान जनजागृती काम नियोजनबध्द पध्दतीने चालू असून यंदाच्या लोकसभा निवडणुकीत ७० टक्याहून अधिक मतदान व्हावे यासाठी विविध माध्यमाचा वापर केला जात आहे असे सांगून रिजनल आऊटरिज ब्यूरो व्दारे हाती घेण्यात आलेल्या मोहिमेव्दारे मतदानाची टक्केवारी वाढवण्यास नक्कीच मदत हाईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. या कार्यक्रमाचा शुभारंभ महासंचालक सत्येंद्र प्रकाश व जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी फित कापून तसेच हवेत फुगे सोडून केला. राज्यातील जिल्हयांमध्ये या जनजागृती मोहिमेला सुरुवात झाली असून सांस्कृतिक कार्यक्रम, नाटीका, संगीत अशा वेगवेगळया कार्यक्रमांच्या माध्यमातून चांगला प्रतिसाद मिळत आहे.