घरमहाराष्ट्रमहिलांच्या सुरक्षेची हमी द्या, भाजप महिला आमदारांचे मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र

महिलांच्या सुरक्षेची हमी द्या, भाजप महिला आमदारांचे मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र

Subscribe

साकीनाका बलात्कार प्रकरणासह राज्यात वाढत्या बलात्काराच्या घटनांमुळे ठाकरे सरकार आणि राज्यपालांमध्ये लेटरवॉर सुरु आहे. अशातच आता राज्यातील महिला सुरक्षा आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित करत भाजपाच्या १२ महिला आमदारांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठविले आहे. राज्यातील महिला अत्याचाराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन आयोजित करण्याची सूचना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्य सरकारला केली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही मागणी फेटाळून लावताना राज्यपालांना लिहिलेल्या खरमरीत पत्रात अन्य राज्यातील महिला अत्याचाराच्या घटनांची जंत्री दिली होती. या पार्श्वभूमीवर भाजप महिला आमदारांनी बुधवारी उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून गुन्हेगारीला आळा घालण्याची मागणी केली आहे.

राज्यातील महिलांच्या सन्मानाबद्दल आपण नेहमी छत्रपती शिवरायांच्या नीतीचा आदर्श ठेवत असतो. महाराष्ट्राच्या स्त्रीसन्मानाचा इतिहास आज खुंटीवर ठेवल्याच्या भावनेने आम्ही व्यथित आहोत. अन्य राज्यांतील गुन्हेगारीशी तुलना करून महाराष्ट्रातील गुन्हेगारी आणि महिलांवरील पाशवी अत्याचारांचे समर्थन होऊ शकणार नाही. या गुन्हेगारीस कठोर पायबंद घालण्यासाठी राज्य सरकारनेच पावले उचलावयास हवीत, अशा शब्दात भाजपाच्या महिला आमदारांनी संताप व्यक्त केला आहे.

- Advertisement -

राज्यपाल महोदयांना उत्तर देऊन आपण राज्यातील अत्याचार पीडित महिलांच्या वेदनेची थट्टा उडविल्याची आमची भावना आहे. केंद्र सरकारकडे बोटे दाखवून अशा घटनांची जबाबदारी आपणास टाळता येणार नाही, असा इशारा आम्ही महाराष्ट्रातील भयग्रस्त महिलावर्गाच्या वतीने आम्ही देत आहोत. आपण योग्य ती दखल घ्याल आणि राज्यातील अनागोंदीचे लंगडे समर्थन तरी थांबवाल, असे पत्रात नमूद केले आहे.

महाराष्ट्रात महिलांवर अत्याचार होत असल्याची कबुली आपण राज्यपालांना पाठविलेल्या पत्रातून दिली असली तरी साकीनाक्यातील त्या दुर्दैवी पाशवी अत्याचारानंतरही मुंबईपलीकडेदेखील असलेल्या महाराष्ट्रात त्यानंतर घडलेल्या काही घटना आपल्या कार्यालयापर्यंत पोहोचल्या नसाव्यात असे दिसते. आपण म्हणता त्याप्रमाणे अशी गुन्हेगारी काही एकट्या महाराष्ट्रात नाही. अन्य राज्यांतही ती आहे. पण आपण त्यामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे याचा अभिमान बाळगावा अशी ही स्थिती खचितच नाही. नापासांच्या स्पर्धेत सर्वाधिक गुण संपादन करून स्वतःची पाठ थोपटून घेण्याचा पळपुटेपणा पुन्हा अशा प्रकरणांतही दाखवावा ही आम्हा शिवरायांच्या महाराष्ट्रातील सावित्रीच्या लेकींसाठी लाजीरवाणी बाब आहे. देशाच्या अन्य राज्यांतही गुन्हेगारी आहे हे आपले कातडीबचाऊ समर्थन शिवरायांच्या महाराष्ट्रास साजेसे नाही, असे पत्रात म्हटले आहे.

- Advertisement -

आपण मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यापासून राज्याच्या प्रत्येक समस्येवर केवळ केंद्राकडे बोट दाखविण्याचे कर्तृत्व दाखविले आहे. आता राज्यातील महिला भयंकर असुरक्षिततेच्या वातावरणात वावरत असताना आणि दिवसागणिक महिलांची अब्रू लुटली जात असतानादेखील आपण संसदेच्या अधिवेशनाची मागणी करून राज्याची अब्रू थेट दिल्लीच्या वेशीवर टांगण्याचा प्रयत्न कशासाठी करत आहात, अशी टीका पत्रातून केली आहे.

केवळ अधिकारी स्तरांवर बैठका घेऊन आणि आदेशांचे कागदी घोडे नाचवून कायदा सुव्यवस्था स्थिती राखण्याचे आपले प्रयत्न फोल आहेत. त्याकरिता सुरक्षा दलांना दबावमुक्त वातावरणात त्यांचे कर्तव्य बजावण्याची मुभा देणे आवश्यक आहे. राज्यातील महिला अत्याचाराच्या अनेक घटनांमध्ये गुन्हेगारांना पाठीशी घालून पीडित महिलांचीच उपेक्षा होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. अशा वेळी केवळ आपल्या खात्याच्या अखत्यारीतील घटना नाही असे लंगडे युक्तिवाद करून स्वतःचा बचाव करण्यामुळेच गुन्हेगारीस खतपाणी मिळत असल्याचे पत्रात म्हटले आहे.

या पत्रावर माधुरी मिसाळ, विद्या ठाकूर देवयानी फरांदे, मनीषा चौधरी, सीमा हिरे, श्वेता महाले- पाटील, मेघना साकोरे- बोर्डीकर, डॉ.नमिता मुंदडा, मंदा म्हात्रे, भारती लव्हेकर मोनिका राजाळे, मुक्ता टिळक यांच्या सह्या आहेत.


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -