हल्ली कचऱ्याच्या वाढत्या प्रमाणामुळे निर्माण होणाऱ्या समस्या रोखणे कठीण होऊन बसले आहे. याशिवाय समुद्र ,तलाव आणि नद्यांमध्येही नागरिक कचरा फेकतात त्यामुळे जलप्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. याच निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण कमी करण्यासाठी नागावच्या अतुल गुरव या तरुणाने पुढाकार घेतला आहे. त्याने समुद्रकिनारी वाहून येणाऱ्या टाकाऊ वस्तूंपासून शोभिवंत वस्तू बनवल्या आहेत. या शोभिवंत वस्तू बनवणे हा खरंतर या तरुणाचा छंद होता. मात्र या कलेला पर्यटकांचा आणि सोशल मिडियावरही चांगला प्रतिसाद मिळाल्याने या तरुणाने आपल्या छंदाचे रुपांतर व्यवसायात केले आहे. हा तरुण आपली कला जोपासत नागावचा समुद्रकिनारा स्वच्छ ठेवण्याचा हेतू साध्य करत आहे.
अतुल गुरव या तरुणाने एक चांगली कला आत्मसात केली आहे. त्याला टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार करण्याचा छंद आहे. यामध्ये तो नारळाच्या करंवटीपासून शोभिवंत वस्तू तसेच समुद्रकिनारी वाहून येणाऱ्या झाडांचे खोड,मुळांपासून प्राणी, पक्षी आणि इतर वस्तू तो तयार करतो तसेच लाकडापासून शोभिवंत राख्यासुद्धा तयार करतो. त्याने त्याच्या छंदाचे रुपांतर व्यवसायात केले आहे. याशिवाय समुद्रकिनारी टाकलेल्या काचेच्या बॉटल,वाहून येणाऱ्या स्लिपर या सर्व टाकाऊ वस्तूंपासून शोभिवंत वस्तू बनवल्या आहेत.
पर्यटकांकडून वस्तूंना मोठ्या प्रमाणात मागणी
गेल्या ७ वर्षापासून हा छंद जोपासत असताना सोशल मिडिया याशिवाय नागाव बीचवर येणाऱ्या पर्यटकांकडून त्याच्या कलेला चांगला प्रतिसाद मिळत असल्याने अतुल गुरव याने त्याच्या छंदाचे व्यवसायात रुपांतर केले.नागाव बीच हे अलिबागमधील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असल्याने मुंबई पुण्याहून येणाऱ्या पर्यटकांचा ओघ मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे तेथे येणाऱ्या पर्यटक आवर्जुन ऑर्डर देऊन वस्तू खरेदी करतात. याशिवाय अनेक ठिकाणी प्रदर्शन भरवली जाऊन तेथे वस्तूंची विक्री केली जाते. त्याने या कलेसाठी कोणत्याही प्रकारचे प्रशिक्षण घेतले नाही. मात्र या छंदाचे व्यवसायात रुपांतर करण्यासाठी मोठ्या मशिनरी आणि साहित्यांची गरज होती यासाठी नागावच्या दिलीप कामतीकर यांनी सहकार्य केले. याशिवाय त्याच्या घरातील व्यक्ती आणि मित्र मंडळींनीही सहकार्य केले.
या तरुणाप्रमाणे आपणही घरात निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण कमी करण्यासाठी ‘टाकाऊतून टिकाऊ’चा पर्याय अधिक कल्पकपणे अवलंबून कचरामुक्तीच्या दिशेने एक पाऊल टाकू शकतो. त्यामुळे कचऱ्यात जाणाऱ्या अनेक वस्तूंचा पुनर्वापर होऊ शकेल.
हे ही वाचा – Rain Update : पुढचे ४८ तास राज्यासाठी महत्त्वाचे, ‘या’ जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज