राज्यातील नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस घट होताना दिसत आहे. काल, रविवारी २२ हजार ४४४ नव्या कोरोना रुग्णांची नोंद आणि ५० जणांना मृत्यू झाला होता. मात्र आज राज्यात नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत आणि मृत्यूच्या संख्येतही घट झाली आहे. गेल्या २४ तासांत राज्यात १५ हजार १४० नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली असून ३९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर दुसऱ्याबाजूला राज्यात ओमिक्रॉनबाधितांच्या संख्येत वाढ झाली आहे. काल राज्यात ५ ओमिक्रॉनबाधित आढळले होते, मात्र आज ९१ जण ओमिक्रॉनबाधित आढळले आहेत.
आज दिवसभरात राज्यात ३५ हजार ४५३ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत एकूण ७३ लाख ६७ हजार २५९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९५.४२ टक्के एवढे झाले आहे. तर मृत्यूदर १.८५ टक्के एवढा आहे. सध्या २ लाख ७ हजार ३५० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७ कोटी ४६ लाख २९ हजार ४४९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७७ लाख २१ हजार १०९ (१०.३५ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ११ लाख ७४ हजार ८२५ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर २ हजार ७९८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
राज्यातील ओमिक्रॉनची परिस्थिती
राज्यात आज दिवसभरात ९१ ओमिक्रॉनबाधितांची नोंद झाली आहे. आज सर्वाधिक रुग्ण नागपूरमध्ये आढळले असून १८ रुग्णांची नोंद झाली आहे. तर औरंगाबाद, रायगड आणि नवी मुंबई मनपा प्रत्येकी ११, मुंबई आणि ठाणे मनपा प्रत्येकी ८, सिंधुदुर्ग आणि सातारात प्रत्येकी ५, अमरावती, पिंपरी चिंचवड मनपा आणि पुणे मनपात प्रत्येकी ४, तर यवतमाळ आणि पुणे ग्रामीणमध्ये प्रत्येकी १ ओमिक्रॉन रुग्णाची नोंद झाली आहे. आतापर्यंत राज्यात ३ हजार २२१ ओमिक्रॉनबाधित आढळले असून १ हजार ६८२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
हेही वाचा – Corona Update: मुंबईत आज १ हजारांपेक्षा कमी नवी रुग्ण नोंद, पण पुण्यात ३,७६२ नव्या रुग्णांची वाढ