राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मागील काही दिवस ६० हजारांहून अधिक रुग्णांची भर पडत होती. पण काल (सोमवारी) नव्या कोरोनाबाधितांची संख्येत घट झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र आज पुन्हा एकदा परिस्थिती जैसे थे आहे. गेल्या २४ तासांत ६२ हजार ९७ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ५१९ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या ३९ लाख ६० हजार ३५९वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ६१ हजार ३४३ जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान राज्यातील कोरोनाबाधितांची संख्येने आता जागतिक कोरोनाच्या यादीत आठव्या क्रमांकाच्या इटलीला क्रोस केलं आहे. इटलीत आतापर्यंत ३८ लाख ९१ हजार ६३ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून आतापर्यंत १ लाख १७ हजार ६३३ जणांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान आज नोंद झालेल्या एकूण ५१९ मृत्यूंपैकी ३०७ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ११४ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ९८ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ९८ मृत्यू, नाशिक- २३, सोलापूर- २०,धुळे- १०, औरंगाबाद- ९, ठाणे- ८, पालघर- ७, नांदेड- ६, अहमदनगर- ५, जळगाव- ५, नंदूरबार- ३, पुणे- १ आणि रायगड- १ असे आहेत. तसेच आज दिवसभरात ५४ हजार २२४ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत एकूण ३२ लाख १३ हजार ४६४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८१.१४ एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.५५% एवढा आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २ कोटी ४३ लाख ४१ हजार ७३६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ३९ लाख ६० हजार ३५९ (१६.२७ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३८ लाख ७६ हजार ९९८ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २७ हजार ६९० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण ६,८३,८५६ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
हेही वाचा – राज्यातील जेलमध्ये कोरोनाचा कहर! आतापर्यंत ९ कैदी आणि ८ जेल कर्मचाऱ्यांचा मृत्यू!