महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कर्नाटक सरकार आणि राज्यातील महाविकास आघाडी सरकार एकमेकांवर टीका करत आहेत. दरम्यान, महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद: संघर्ष आणि संकल्प या पुस्तकाच्या उद्घाटनावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादातील वादग्रस्त भाग हा महाराष्ट्राचा असल्याचं ठणकावून सांगितलं. यानंतर आता मुख्यमंत्र्यांनी सीमाभाग महाराष्ट्राचाच असल्याचा पुरावा दिला आहे. सीमाप्रश्नाबाबत ५० वर्षांपूर्वी महाराष्ट्राने तयार केलेला दृकश्राव्य स्वरुपातील दस्तऐवज महाराष्ट्र सरकारने सादर केला आहे. साठ वर्षांपूर्वी कारवारमधल्या एका शाळेत इंग्रजी, मराठी, कोंकणीतून अर्थ शिकविणारी शिक्षिका, एनसीसी बटालियनचा जुना मराठी नामफलक, कानडा जिल्ह्याचे ‘विचारी’ हे मराठीतील पहिले वृत्तपत्र, १९१२ चा कारवार अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचा मराठी वार्षिक अहवाल, बेळगावमधील १८९० मध्ये बांधलेल्या पुलाचा मराठीतला शीलाफलक अशा प्रकारे कर्नाटकातल्या सीमा भागामधले शंभर-सव्वाशे वर्षांपूर्वीपासूनच्या मराठी भाषेचे आणि संस्कृतीचे पुरावे महाराष्ट्र सरकारने उपलब्ध करुन दिलेल्या लघुपटात आहेत.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरुन दोन्ही राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र शासनाने ५० वर्षांपूर्वी तयार केलेला ‘अ केस फॉर जस्टीस’ हा ३५ मिनिटांचा अप्रतिम आणि संग्राह्य लघुपट सर्वांना बघण्यासाठी उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले. त्यानुसार राज्याच्या माहिती व जनसंपर्क संचालनालयाने उपलब्ध करुन दिला आहे.
या लघुपटामध्ये अनेक पुरावे दिसत आहेत. “घडली माला अश्रू फुलांची” या सामाजिक नाटकाचा नोव्हेंबर १९७० मधला मराठीतला फलक, १९३९ मधील स्थापन झालेल्या कारवारच्या मराठी महिला मंडळाची बैठक, तत्कालीन म्हैसूर राज्यातील नामांकित नेते आनंद नाडकर्णी यांचे १९१२ मधील मराठीतले दत्तक पत्र, कानडा जिल्ह्यातील १९६० मधील पहिले मराठी वृत्तपत्र, १८९० मधला बेळगाव म्युनिसिपालटीने बांधलेल्या पुलावरील मराठीतील शिलाफलक, कोळी पुरुष आणि महिलांची त्या काळाची महाराष्ट्रीय वेशभूषा असे नानाविध पुराव्यांचे प्रभावी चित्रीकरण या लघुपटात पहायला मिळते. यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, इंदिरा गांधी, लालबहादूर शास्त्री यांनी सीमा प्रश्नासंदर्भात बैठका आणि सभांमधून केलेल्या भाषणांचे व्हिडीओ देखील आपण पाहू शकतो.
सीमाप्रश्नाबाबत ५० वर्षांपूर्वी महाराष्ट्राने तयार केलेला दृकश्राव्य स्वरुपातील हा दस्तऐवज सीमा भागातील आणि बेळगाव शहरातील लोकजीवन, व्यापारी आणि अन्य व्यवहार, रोजची भाषा, वृत्तपत्रांचा वापर, शाळा, देवळे, मठ, पोथ्या, मराठी गाणी, भजन/कीर्तने, नगरपालिका दस्तऐवज, व्यापारी चोपड्या, खतावणी, शीलालेख असे जवळपास हजारो फुटांची लांबी भरेल एवढे चित्रीकरण करुन तयार केलेला हा माहितीपट आहे.
तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक, शिवाजीराव गीरधर पाटील आणि शरद पवार यांनी या माहितीपटाच्या निर्मितीसाठी मार्गदर्शन केलं होतं. मुख्यमंत्र्यांचे तत्कालीन जनसंपर्क अधिकारी मधुमंगेश कर्णिक यांची संकल्पना, संहिता, लेखन असलेल्या या माहितीपटाचे दिग्दर्शक होते चित्रपटतज्ज्ञ कुमारसेन समर्थ. सुप्रसिद्ध दिग्दर्शक विश्राम बेडेकर, निवृत्त मुख्य सचिव एम.डी. भट (आयसीएस) आणि ना.ग. नांदे यांचे मार्गदर्शन या माहितीपटासाठी घेण्यात आले होते.