घरमहाराष्ट्रकोरोनामुळे विधवा झालेल्या महिलांसाठी योजना लागू, राज्य सरकारचा निर्णय

कोरोनामुळे विधवा झालेल्या महिलांसाठी योजना लागू, राज्य सरकारचा निर्णय

Subscribe

कोरोना जागतिक महामारीच्या कालावधीत घरातील कर्ता पुरूष मृत्यूमुखी पडल्याने विधवा झालेल्या महिलांना उत्पन्नाचे साधन उपलब्ध व्हावे यासाठी ग्रामविकास विभागाचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी पुढाकार घेऊन अशा महिलांसाठी ‘वीरभ्रदकाली ताराराणी स्वयंसिद्धा योजना’ राबविण्याचा निर्णय घेतला असून मंगळवारी यासंदर्भातील शासन निर्णय निर्गमित करण्यात आला.

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानच्या (उमेद) माध्यमातून ग्रामीण भागातील गरीब आणि जोखीमप्रवण महिलांना समृद्ध, आत्मसन्मानाचे तसेच सुरक्षित जीवन जगता यावे, यासाठी शाश्वत उपजीविकेच्या संधी प्राप्त होण्याच्या दृष्टीने पोषक वातावरणाची निर्मिती होण्यासाठी या अभियानाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहे. याचाच भाग म्हणून विविध योजनांमध्ये कृतीसंगमाच्या माध्यमातून ही योजना राबविण्यास शासनाने मान्यता दिली आहे.

- Advertisement -

या शासन निर्णयान्वये जिल्हा स्तरावरून गावनिहाय माहिती प्राप्त करून एकल,विधवा महिलांना स्वयंसहाय्यता समूहामध्ये प्राधान्याने समाविष्ठ करण्यात येणार आहे. तसेच रिजर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमावलीनुसार विशेष बाब म्हणून एकल/विधवा महिलांचा किमान पाच महिला सदस्यांचा स्वतंत्र स्वयंसहाय्यता समूह स्थापन करण्यात येणार असून त्यांना महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे लाभ उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

या समुहातील सदस्यांना फिरता निधी आणि समुदाय गुंतवणूक निधीही अदा करण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. या एकल/विधवा महिलांना पीएमजेजेबीवाय आणि पीएमएसबीवाय योजनेचे ३४२ रूपये निधी भरण्यास बिनव्याजी कर्जही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच या महिलांना आरोग्य विमा योजनेचाही लाभ देण्यासाठी पात्र महिलांना महात्मा फुले जनआरोग्य योजनेत समाविष्ट करण्यात येणार आहे.

- Advertisement -

उमेदमार्फत एकल/विधवा महिलांना रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधीही प्राधान्याने उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या महिलांना तसेच त्यांच्या कुटुंबातील १८ ते ३५ वयोगटातील युवक, युवतींना दीन दयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेच्या माध्यमातून प्रशिक्षण देतानाही प्राधान्य देण्यात येणार आहे. आरसेटी योजनेअंतर्गत १८ते ४५ या वयोगटातील युवक-युवतींना १० ते ४५ दिवसांचे कृषि विषयक प्रशिक्षण, प्रक्रिया उद्योग विषयक प्रशिक्षण, उत्पादक विषयक प्रशिक्षण असे विविध व्यवसायांचे मोफत व निवासी प्रशिक्षण दिले जाणार आहे.

कोरोना महामारीत घरातील कर्त्या पुरूषांच्या अकाली निधनाने कुटुंबांवर जी आपत्ती ओढविली, ती या शासन निर्णयाद्वारे काही प्रमाणात तरी दूर होईल, असा विश्वास हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला आहे.


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -