मुंबई : लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच, सत्ताधारी तसेच विरोधकांच्या आघाड्यांमध्ये जमवाजमव सुरू झाली आहे. राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र नवनिर्माण सेना भाजपाप्रणित महायुतीत सहभागी होण्याची शक्यता असून त्याची लवकरच अधिकृत घोषणा होईल, असे सांगण्यात येते. यावरूनच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी भाजपाव निशाणा साधला आहे.
हेही वाचा – BJP: अमित शहा खरे की फडणवीस; पक्ष फुटीवर भाजपा नेत्यांची वेगवेगळी विधाने
‘अब की बार 400 पार’, असा नारा भाजपाने दिला असून नरेंद्र मोदी यांना तिसर्यांदा पंतप्रधान करण्यासाठी भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने कंबर कसली आहे. म्हणूनच भाजपाने एकेक जागा जिंकण्यासाठी ताकद पणाला लावली आहे. शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा रिपब्लिकन गट यापाठोपाठ भाजपाने मनसेलाही सोबत घेण्याची तयारी केली आहे.
आज देशभरात भाजपसाठी असलेली प्रतिकूल परिस्थिती बघता पराभवाच्या भीतीपोटी भाजपा आता छोटे छोटे मित्रपक्ष जोडत आहे. एकीकडे ४०-४० आमदार असलेल्या फुटीर गटांना जागावाटपाच्या वाटाघाटी करताना हवं ते मिळत नाही तर दुसरीकडे १-१ आमदार असलेल्या छोट्या पक्षांना मात्र भाजप पायघड्या अंथरतोय.
असला…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) March 21, 2024
पाच वर्षांपूर्वी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात भाजपाचे शीर्षस्थ नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात ‘लाव रे तो व्हिडीओ’ म्हणत रान उठवणारे राज ठाकरे यांनी मंगळवारी नवी दिल्लीत भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या. भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी सकाळी राज ठाकरे यांच्यासोबत चर्चा केली. यानंतर राज ठाकरे आणि अमित शहा यांची भेट झाली होती.
हेही वाचा – Lok Sabha 2024 : काँग्रेसचे महायुतीला मोठे आव्हान; पटोले, वडेट्टीवार, प्रणिती शिंदे, धंगेकर रिंगणात
या घडामोडींसंदर्भात आमदार रोहित पवार यांनी ट्वीट केले आहे. आज देशभरात भाजपासाठी असलेली प्रतिकूल परिस्थिती आहे. पराभवाच्या भीतीपोटी भाजपा आता छोटे-छोटे मित्रपक्ष जोडत आहे. एकीकडे 40-40 आमदार असलेल्या फुटीर गटांना जागावाटपाच्या वाटाघाटी करताना हवे ते मिळत नाही तर, दुसरीकडे 1-1 आमदार असलेल्या छोट्या पक्षांना मात्र भाजपा पायघड्या अंथरत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
असला शाही पाहुणचार बघून छोटे पक्ष मनातल्या मनात मांडे खात असले तरी ‘उपयुक्तता असेपर्यंत वापरायचे आणि नंतर पूर्णतः संपवून आपले गुलाम बनवून फेकायचे’ या भाजपाच्या मूळ स्वभावापासून मात्र ते अनभिज्ञ दिसतात. या छोट्या पक्षांकडे बघून अल्पावधीतच आधीच शिकार झालेले मोठे पक्ष, ‘नया है वह’ असेच म्हणत असतील, असा टोला त्यांनी लगावला आहे.
हेही वाचा – Jitendra Awhad : ही तर जिजाऊंची लेक, रुपाली चाकणकरांना जितेंद्र आव्हाडांनी सुनावले