सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाचा कायदा रद्द केल्याने राज्य सरकारने मराठा समाजाला दिलासा देण्यासाठी EWS मध्ये लाभ घेता येईल असा आदेश काढला आहे. यासंदर्भातील माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली. EWS मध्ये मराठा समाजाला लाभ घेता येईल असा आदेश सरकारच्यावतीने निर्गमित करण्यात आला असल्याची माहिती नवाब मलिक यांनी दिली.
कुठल्याही वर्गात आरक्षणाचा लाभ मिळत नाही त्या समाजाला EWS मध्ये लाभ मिळणार आहे. ज्यांचे उत्पन्न ८ लाखापेक्षा कमी आहे त्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे असेही नवाब मलिक म्हणाले. आजच्या घडीला मराठा समाजाला जे विशेष आरक्षण देण्यात आले होते ते न्यायालयाने रद्द केले आहे आणि आता ते प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे आता जो गरीब मराठा वर्ग आहे त्यांना राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयाचा लाभ घेता येणार आहे. त्यासाठी राज्यसरकारने हा आदेश निर्गमित केला आहे. या निर्णयामुळे मराठा समाजाला थोडाफार दिलासा मिळेल असेही नवाब मलिक म्हणाले.
संपूर्ण देशात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना १० टक्केच आरक्षण देण्यात आलेले आहे. ज्या जातींना आरक्षणाचा लाभ मिळत नाही त्यांना EWS चा लाभ घेता येईल. मराठा आरक्षणाबाबत निर्णय होत नाही तोपर्यंत जे गरीब मराठा लोक आहेत त्यांना याचा फायदा होईल म्हणून राज्यसरकारने आदेश निर्गमित केला असल्याचे नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.