औरंगाबादमधील सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मशिदींवरील भोंग्यांविरोधातील भूमिका कायम ठेवली आहे. ४ मेनंतर राज्यात मशिदींसमोर हनुमान चालिसा लावणार असल्याचा इशारा राज ठाकरेंनी दिला आहे. दरम्यान ईद निमित्त राज ठाकरेंना शिरखुरमासाठी बोलवण्याच्या लायकीचे राहिले नाहीत, त्यामुळे त्यांना दुरुनच ईद मुबारक अशी प्रतिक्रिया एमआयएम नेते आणि खासदार इम्तियाज जलील यांनी दिली आहे. मशिदींच्या भोंग्यांवरुन घेतलेल्या भूमिकेमुळे राज ठाकरेंवर मुस्लिम पदाधिकारी नाराज आहेत.
एमआयएमचे नेते आणि खासदार इम्तियाज जलील यांनी माध्यमांशी संवाद साधताना राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे. राज ठाकरेंना शिरखुरमा खाण्यासाठी बोलावलं का? असा प्रश्न जलील यांना विचारण्यात आला होता. यावर जलील म्हणाले की, राज ठाकरे त्या लायकीचे आता राहिले नाही. त्यामुळे त्यांना दुरुनच ईद मुबारक देतो. राज ठाकरेंनी औरंगाबादच्या सभेत जी भाषा वापरली आहे त्यामुळे ते आता बोलवण्याच्या लायकीचे राहिले नाहीत.
नमाज पठणावेळी जलील भावूक
खासदार इम्तियाज जलील ईदगाह मैदानावर नमाज अदा करण्यासाठी पोहोचले होते. नमाज सुरु असताना जलील भावूक झाले होते. त्यांच्या डोळ्यांतून अश्रू आले होते. डोळ्यांतील अश्रू पुसत असताना जलील कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. मात्र जलील अचानक का भावूक झाले असा प्रश्न सर्वाना पडला आहे. दरम्यान दोन महिन्यांपूर्वी आईचं निधन झाले. आज ईद असल्यामुळे आठवणींचा बांध फुटला असे जलील यांनी सांगितले.
राज ठाकरे भूमिका स्पष्ट करणार?
अक्षय्य तृतीयेच्या पार्श्वभूमीवर आज मनसेकडून राज्यात ठिकठिकाणी मंदिरांमध्ये महाआरतीचं आयोजन करण्यात आलं होतं. परंतु राज ठाकरेंनी अचानक माघार घेत महाआरती रद्द केली आहे. ईद असल्यामुळे राज ठाकरेंनी असा निर्णय घेतला असल्याचे समजते आहे. दरम्यान भोंग्याबाबतच्या निर्णयावर राज ठाकरे आपली भूमिका आज जाहीर करणार असल्याचही नमूद केलं आहे. पार्श्वभूमीवर सकाळी दहा वाजता मनसेच्या महत्त्वाच्या नेत्यांच्यासोबत राज ठाकरेंची शिवतीर्थवर बैठक आहे. त्यानंतर ते आपली भूमिका जाहीर करणार आहे. परंतु ते कोणती घोषणा करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा : कुणीही मनात आणलं तरी राज्याची सुव्यवस्था बिघडवू शकत नाही – खासदार संजय राऊत