मुंबई: येत्या दोन दिवसांत उन्हाचा तडाखा आणखी वाढणार आहे. उन्हाच्या तीव्र झळांनी नागरिक हैराण झाले आहेत. घामाच्या धारा निघत आहेत. अशातच मुंबई आणि परिसरात विकेंडला सूर्य आग ओकणार आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. सध्या राज्यात तापमानाचा पारा 37 ते 38 डिग्री सेल्सिअरवर राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. (Mumbai Heat Wave The heat will increase on the weekend)
मागच्या दोन आठवड्यांपासून मुंबईत उन्हाचा पारा प्रचंड वाढला आहे. आणखी दोन दिवस मुंबई, ठाणे, पालघर, रायगडमध्ये उष्णतेच्या तीव्र लाटेची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवली आहे. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात वाढत्या तापमानामुळे अंगाची लाहीलाही होणार आहे.
शुक्रवारपासून पारा वाढण्यास सुरुवात होणार आहे. शनिवार, रविवारी पारा चढता असणार आहे. 26,27,28 एप्रिलला मुंबईसह पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात उन्हाचा पारा चढणार आहे.
काळजी घेण्याचं आवाहन
आठवड्याच्या शेवटी मुंबईकरांनी विनाकारण घराबाहेर पडणे टाळा. दुपारी 12 ते सायंकाळी 4 या वेळेत घरातून बाहेर पडू नये, असं आवाहन करण्यात आलं आहे. मुंबईकरांना काळजी घेण्याचं आवाहन तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे. भरपूर पाणी पिण्याचा सल्लाही प्रशासनाकडून नागरिकांना देण्यात आला आहे.
मार्च महिन्याच्या सुरूवातीपासूनच सूर्य तळपत आहे. दिवसेंदिवस पारा वाढत असून आतापासूनच आरोग्याची काळजी घेणं आवश्यक आरहे. घरात तसंच रखरखत्या उन्हात घराबाहेर पडण्यापूर्वी काही गोष्टी कटाक्षाने पाळण्याची गरज आहे. त्यामुळे शरीराची लाही लाही करणारा उन्हाळा सहज निघून जाईल.
मुंबई उष्णतेच्या लाटेचे स्पष्टीकरण: येत्या 2 दिवसांसाठी मुंबईचे कमाल तापमान 39°C राहील व नंतर हळूहळू कमी होण्याची शक्यता.
-IMD
कृपया घाबरू नका पण काळजी घ्या. किनारपट्टीच्या भागासाठी उष्णतेच्या लाटेचा निकष: कमाल तापमान सामान्य तापमानापेक्षा 4.5°C वर व कमाल तापमान किमान 37°Cअसावे. pic.twitter.com/0u2vQ2ivLn— K S Hosalikar (@Hosalikar_KS) March 14, 2022
उन्हाळ्यात अशी घ्या काळजी
- आवश्यक काम असेल तरच घराबाहेर पडा.
- सुती, फिक्या किंवा पांढऱ्या रंगाचे कपडे वापरा.
- डोक्याला टोपी व डोळ्यांना गॉगल वापरा
- झळा लागू नये यासाठी संपूर्ण अंग झाकलेले कपडे वापरा
- ताप आल्यास वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्या
- थंड पाण्याने स्नान करावे. दुपारी अर्धा तास झोपावे
- उन्हातून आल्यास लगेच पाणी पिऊ नये.
- ताक, कैरीचं पन्हं, कोकम किंवा लिंबू सरबत घ्यावं.
- आहार हलक्या स्वरुपाचा ठेवावा.
उन्हाचा त्रास झाला तर काय कराल?
- नाकातून रक्त आल्यास डोक्यावर पाणी मारावं
- ज्यांना उष्णतेचा प्रचंड त्रास होतो, अशा व्यक्तींनी आंघोळ झाल्यानंतर पाच ते दहा मिनिटं ओल्या अंगानेच राहावं. त्यामुळे शरीराला थंडावा मिळतो.
- रात्री झोपताना उजव्या कुशीवर झोपावं. चंद्रनाडी चालू राहिली की गारवा निर्माण होतो.
- तेलकट, मसालेदार पदार्थ शक्यतो टाळावे.
- तसंच, सब्जा घातलेलं पाणी वारंवार प्यावं
(हेही वाचा: Maharashtra Weather : मुंबई, कोकणात पुढील 48 तासांत उकाडा वाढणार तर, विदर्भात मुसळधार; IMDचा इशारा)
Edited By- Prajakta Parab