मुंबई : राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि विधिमंडळ सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर पक्षाच्या नेतेमंडळीकडून याबाबत मत व्यक्त करण्यात येत आहे. अशोक चव्हाणांच्या या निर्णयामुळे काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी X या सोशल मीडिया साइटवरील त्यांच्या अधिकृत अकाउंटवरून एक पोस्ट केली आहे. “कोण, कशासाठी, कुठे जात आहे? हे जनता उघड्या डोळ्याने पहात आहे.” असा टोला त्यांनी या पोस्टच्या माध्यमातून अशोक चव्हाण यांना लगावला आहे. ( Nana Patole’s reaction after Ashok Chavan’s resignation)
हेही वाचा… Bhai Jagtap : पक्षांत अनेकांना तुच्छ वागणूक, भाई जगतापांचा खळबळजनक दावा
अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर अनेक नेतेमंडळी आपले मत व्यक्त करत आहेत. काहींनी प्रसार माध्यमांच्यासमोर येत आपले मत व्यक्त केले. तर सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत. या राजकीय भूकंपानंतर नाना पटोलेंनी पोस्ट करत म्हटले आहे की, “काँग्रेस पक्षाने अनेक नेत्यांना खूप काही काही दिले आहे. आज काँग्रेस पक्ष संविधान आणि लोकशाही वाचविण्याची लढाई लढत असताना सर्वकाही मिळालेले नेते काँग्रेस पक्षाला आणि विचारधारेला सोडून जात आहेत हे दुर्दैवी आहे. कोण, कशासाठी, कुठे जात आहे? हे जनता उघड्या डोळ्याने पाहात आहे. आम्ही सर्व काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते काँग्रेसचा विचार आणि लोकशाही वाचविण्यासाठी धर्मांध, हुकुमशाही वृत्तीच्या भारतीय जनता पक्षाविरोधात पूर्ण ताकदीनिशी लढून त्यांना पराभूत करू.”
काँग्रेस पक्षाने अनेक नेत्यांना खूप काही काही दिले आहे. आज काँग्रेस पक्ष संविधान आणि लोकशाही वाचविण्याची लढाई लढत असताना सर्वकाही मिळालेले नेते काँग्रेस पक्षाला आणि विचारधारेला सोडून जात आहेत हे दुर्देवी आहे. कोण, कशासाठी, कुठे जात आहे? हे जनता उघड्या डोळ्याने पहात आहे. आम्ही… pic.twitter.com/7hh2U7nHg2
— Nana Patole (@NANA_PATOLE) February 12, 2024
नाना पटोलेंनी केलेल्या पोस्टमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगल्या आहेत. तर या घटनेनंतर राष्ट्रीय नेत्यांशी चर्चा करण्यासाठी नाना पटोले दिल्लीला रवाना झाल्याचे सांगण्यात येत आहे. तर महत्त्वाची बाब म्हणजे, काँग्रेसचे माजी आमदार नसीम खान, राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात हे अशोक चव्हाण यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु, अशोक चव्हाण हे त्यांच्या निर्णयावर ठाम असल्याने पुढील दोन दिवसांमध्ये ते त्यांची भूमिका जाहीर करणार असल्याचे त्यांच्याकडून प्रसार माध्यमांना सांगण्यात आले.
गेल्या काही महिन्यांपासून काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह सुरू असल्याचे सांगण्यात येत होते. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यामुळेही हा कलह सुरू असल्याच्या चर्चा सुरू होत्या. परंतु, आज अशोक चव्हाण यांनी घेतलेल्या निर्णयानंतर काँग्रेस आमदार भाई जगताप यांनी प्रदेशाध्यक्षांकडून अनेकांना तुच्छतेची वागणूक दिली जात असल्याचे सांगितले. ज्यानंतर आता काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. चव्हाण यांच्यासारखा मोठा नेता काँग्रेसमधून बाहेर पडल्याने पक्षाला मोठे खिंडार पडले आहे. अशोक चव्हाण यांनी विधानसभा अध्यक्षांची भेट घेत त्यांच्या आमदारकीचा राजीनामा त्यांच्याकडे सोपवला असून चव्हाणांचा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे.