लासलगाव : नांदूरमध्यमेश्वर, देवगाव, कानळद, रुई, वाकद, कोळगाव, खेडलेझुंगेसह इतर अनेक गावांमध्ये गोदावरी डावा कालवा, गोदावरी उजवा कालवा या कालव्यांचा शेजारीस शेतामध्ये प्रंचड पाणी तुंबून शेतकर्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतातून पाणी जाण्यासाठी महसूल विभाग आणि जलसंपदा विभागाच्या यंत्रणांनी पाण्याचा निचरा होण्यासाठी उपाययोजना करण्यात येऊन नुकसानग्रस्त शेतकर्यांचे तातडीने पंचनामे करा. अशा सूचना राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी संबंधित अधिकार्यांना दिल्या.
भुजबळ यांच्या उपस्थितीत निफाड तालुक्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीबाबत निफाड शासकीय विश्रामगृह येथे आढावा बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पंचनामे आणि मदतीच्या निकषांबाबत त्यांनी मदत आणि पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता आणि जिल्हाधिकारी डी. गंगाथरन यांच्यासोबत दूरध्वनीवरून चर्चा करून या भागातील शेतकर्यांना मदत मिळण्यासाठी कार्यवाही करण्याच्या सूचना स्थानिक अधिकार्यांना दिल्या.
यावेळी आमदार दिलीप बनकर, प्रांताधिकारी डॉ. अर्चना पठारे, तहसीलदार शरद घोरपडे, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता सागर शिंदे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता गणेश चौधरी, राजेंद्र डोखळे, विधानसभाध्यक्ष वसंत पवार, हरिश्चंद्र भवर, ज्ञानेश्वर शेवाळे, सुरेश खोडे, विलास बोरस्ते, विनोद जोशी, शिवाजी सुपनर, पांडुरंग राऊत आदीसह अधिकारी पदाधिकारी व अनेक गावचे सरपंच उपस्थित होते. निफाड तालुक्यात अतिवृष्टी आणि संततधार पावसामुळे कांद्याची रोपे सडली विशेषतः मक्याच्या पिकासह इतर सर्व पिके भुईसपाट झाली आहेत. सोयाबिन आणि उसाचेही नुकसान झाले. टोमॅटोसाठी मोठ्या प्रमाणात खर्च करून उभे केलेले मंडप कोसळून नुकसान झाले. पाणी आणि चिखलामुळे पिके सडली आहे. शेतकर्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.त्याचप्रमाणे या वर्षी दुसरे एक संकट निर्माण झाले. गोदावरी कालव्यालगत असणार्या शेतकर्यांच्या शेतात पाणी जाऊन पिकांचे प्रचंड नुकसान झाले. याबाबत राज्याचे प्रधान सचिव असीम गुप्ता व जिल्हाधिकार्यांशी चर्चा करून शासनाच्या नियमावलीत बदल करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. त्याप्रमाणे ६५ मिलिमीटर पेक्षा कमी पाऊस असलेल्या मात्र संततधार पाऊस असल्याने नुकसान झालेल्या नुकसानग्रस्त भागाचे प्रस्ताव सादर करण्यात यावेत अशा सूचना त्यांनी अधिकार्यांनी दिल्या. तसेच या कामात दिरंगाई आणि टाळाटाळ खपवून घेतली जाणार नाही अशा इशारा अधिकार्यांना त्यांनी दिला.