घरमहाराष्ट्रनाशिकपदवीधरचा मंतदारसंघाचा बिगूल वाजणार

पदवीधरचा मंतदारसंघाचा बिगूल वाजणार

Subscribe

चालु आठवड्यात आचारसंहिता लागू होण्याची शक्यता

नाशिक : नाशिकसह पाच जिल्ह्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या पदवीधर मतदारसंघाची निवडणूक येत्या काही दिवसांत जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला असून, निवडणूक जाहीर होताच एक ते दीड महिना आचारसंहिता लागू राहील.

पदवीधर मतदारसंघाची निर्मिती झाल्यापासून भाजपचा वरचष्मा राहिला आहे. मात्र, काँग्रेसचे विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी विजयाची हॅटि्ट्रक २०१७ मध्ये पूर्ण केली. त्यांना पराभूत करुन पुन्हा गड मिळवण्यासाठी भाजपचे महसूलमंत्री बाळासाहेब विखे पाटील यांचे बंधू राजेंद्र विखे पाटील यांना रिंगणात उतरवण्याची तयारी सुरू केल्याची चर्चा आहे. विधानपरिषदेच्या पदवीधर मतदारसंघासाठी नाशिकसह अहमदनगर, धुळे, जळगाव व नंदुरबार या पाच जिल्ह्यांतील पदवीधर व्यक्ती मतदान करतात. पाच जिल्ह्यांचा अवाढव्य मतदारसंघ पिंजून काढताना भल्याभल्या उमेदवारांची भंबेरी उडते. त्यात नाशिक व अहमदनगर जिल्ह्यात भौगोलिकदृष्ठ्या सर्वाधिक मतदारांची नोंदणी होत असल्याने याच जिल्ह्यांतील उमेदवारांचे या मतदारसंघावर वर्चस्व राहिले आहे.

- Advertisement -

भाजप नेते उत्तमराव पाटील हे दोन वेळा या मतदारसंघाचे आमदार म्हणून निवडून आले आहेत. तर, ना. स. फरांदे हेदेखील भाजपच्याच चिन्हावर दोन वेळा विधानपरिषदेत पोहोचले. त्यामुळे भाजपचा मतदारसंघ म्हणूनही काही काळ पदवीधर मतदारसंघाची ओळख बनली होती. माजी खासदार प्रतापदादा सोनवणे हे दोन वेळा पदवीधर मतदारसंघातून निवडून आलेले असताना त्यांनी खासदारकी मिळवली. त्यानंतरच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे डॉ. सुधीर तांबे यांनी विजय मिळवला. त्यानंतर सलग दोनवेळा त्यांनी मतदारसंघात कुणालाही प्रवेश करू दिलेला नाही. ही पार्श्वभूमी लक्षात घेतल्यास २०१७ च्या निवडणुकीत भाजपचे माजी केंद्रिय मंत्री डॉ. सुभाष भामरे यांचे जावई डॉ. प्रशांत पाटील यांनी ही निवडणूक लढवली. भाजपचा करिष्मा कायम राहिल, असे वाटत असताना काँग्रेसने सामुहिकरित्या प्रयत्न करत ४० हजार मतांनी ही निवडणूक जिंकली. डॉ. तांबे यांना ८३ हजार ३११  तर डॉ. पाटील यांना ४० हजार ४८६ मते मिळाली. त्यांच्यासाठी माजी मंत्री डॉ. भामरे यांनी प्रयत्नांची पराकाष्टा केली.

या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे अहमदनगरपासून ते नंदुरबारच्या शेवटच्या टोकापर्यंत विस्तारलेला मतदारसंघ व दर सहा वर्षांनी म्हणजेच निवडणुकीपूर्वी मतदारांची नव्याने नोंदणी केली जाते. त्यामुळे गेल्या निवडणुकीत इतके मतदार होते म्हणून पुढील निवडणुकीतही तेच मतदार राहतील, याची शाश्वती नसते. यंदा हा आकडा तीन लाखांवर पोहोचला आहे. या मतदारसंघाने आजवर मातब्बर नेत्यांना पराभवाची धुळ चारली आहे. यात माजी खासदार स्व. उत्तमराव ढिकले यांचा ना. स. फरांदे यांनी पराभव केला. तर, प्रतापदादा सोनवणेंनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे भाचे विनायक देशमुख यांना पराभूत केले. विद्ममान आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी मविप्र समाज शिक्षण संस्थेचे विद्यमान सरचिटणीस अ‍ॅड. नितीन ठाकरे यांना पराभूत केले. तसेच, प्रसाद हिरे किंवा डॉ. प्रशांत पाटील या सर्वांनी पदवीधर मतदारसंघात आपले नशिब
आजमावले आहे.

- Advertisement -

नाशिकमधून यांची तयारी…

नाशिकमधून क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक (व्ही. एन. नाईक) शिक्षण संस्थेचे सरचिटणीस हेमंत धात्रक, डॉ. प्रशांत पाटील तर, धुळ्यातून धनंजय विसपुते, राजेंद्र विखे पाटील हे तयारी करत असल्याचे दिसते. काँग्रेसचे अधिकृत उमेदवार म्हणून डॉ. सुधीर तांबे यांनी नव्याने तयारी सुरू केली आहे. तीन वेळा या निवडणुकीचा अनुभव असलेल्या डॉ. सुधीर तांबे यांना पराभूत करण्याचे खर्‍या अर्थाने आता भाजपसमोर आव्हान उभे राहिले आहे.

 

प्रमोद उगलेhttps://www.mymahanagar.com/author/pramodu/
3 वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय.डिजिटल, प्रिंट मीडियाचा अनुभव. मनोरंजन, लाईफस्टाईल विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -