नाशिक : संस्कार फक्त महिलांनी करायचे का. प्रत्येक पुरुष मुलांच्या हातामध्ये चांगली पुस्तके देवू शकतो. त्यातून मुलांना वाचण्याचे बळ मिळेल. वाचन संस्कृती रूजवणे गरजेचे पाहिजे. पुस्तकांचं हॉटेल हे देवघर आहे. या ठिकाणी खाद्यपदार्थांसमवेत पुस्तके ग्राहकांना दिली आहेत, हे कौस्तुकास्पद आहे. पुस्तकांची हॉटेल्स प्रत्येक शहरात झाल्यास राज्यातील सास्कृतिक वातावरण बदलेल, असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी तथा गीतकार प्रकाश होळकर यांनी केले.
अक्षरबंध प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणार्या ‘राज्यस्तरीय अक्षरबंध साहित्य पुरस्कार वितरण सोहळा रविवारी (दि. २५) पुस्तकांचं हॉटेल-आजीचे वाचनालय, दहावा मैल, मुंबई-आग्रा महामार्ग, आडगाव शिवार येथे आयोजित करण्यात आला होता. ज्येष्ठ कवी तथा गीतकार प्रकाश होळकर यांच्या हस्ते पुरस्कारार्थींचा सन्मान करण्यात आला. सन्मानचिन्ह, सन्मानपत्र आणि तीन हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून साहित्यिक ऐश्वर्य पाटेकर, विजयकुमार मिठे, हेमंत राजाराम , विवेक उगलमुगले, यशवंत पाटील, किरण सोनार, राजू देसले, अर्चना जोशी, प्रशांत भरवीरकर, प्रा. डॉ. प्रकाश शेवाळे, प्रा. विद्या सुर्वे-बोरसे, प्रशांत कापसे उपस्थित होते. वृक्ष व ग्रंथ पूजनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. अवनी जोंधळी हिने कुसुमाग्रजांना आदरांजली देत गीत गायले. रवींद्र मालुंजकर यांनी सूत्रसंचालन, तर प्रा. डॉ. गणेश मोगल यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अक्षरबंध प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रवीण जोंधळे, उपाध्यक्ष सप्तर्षी माळी, सुवर्णा घुगे, कल्याणी बागडे, योगेश विधाते, अक्षय बर्वे, गीत माळी यांनी परिश्रम घेतले.
असे आहेत अक्षरबंध साहित्य पुरस्कारार्थी
अक्षरबंध प्रतिष्ठानतर्फे अक्षरबंध साहित्य पुरस्कार औरंगाबाद येथील ज्योती सोनवणे यांच्या ‘दमकोंडी’ कथासंग्रहाला, पिंपळगाव येथील लक्ष्मण महाडिक यांच्या ‘स्त्री कुसाच कविता’ काव्यसंग्रहाला, औरंगाबाद येथील रमेश रावळकर यांच्या ‘टिश्यू पेपर’ कादंबरीला, मुंबई येथील डॉ.स्मिता दातार यांच्या ‘प्रभु अजि गमला’ या चरित्र लेखनाला, मुंबई येथील वीणा रारावीकर यांच्या ‘आकाशवीणा’ या ललित वाड्मयाला, नाशिक येथील राजेंद्र उगले यांच्या ‘थांब ना रे ढगोबा’ या बालसंग्रहाला, पुणे येथील प्रसाद ढापरे यांच्या ‘इकिगाई’ या अनुवादित पुस्तकाला आणि अमरावती येथील डॉ. राजेंद्र राऊत यांच्या ‘लीळाचरित्रातील कथनरुपे’ या समीक्षापर ग्रंथाला सर्वेात्कृष्ट पुरस्कार देण्यात आला.
शंकर कापडणीस यांना जीवनगौरव पुरस्कार
सटाणा येथील ज्येष्ठ साहित्यिक शंकर कापडणीस यांना कवी प्रकाश होळकरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, पाच हजार रूपये आणि अक्षरबंध जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर यवतमाळ पुसद येथील निशा डांगे-नायगावकर यांना मान्यवरांच्या हस्ते ‘अक्षरबंध साहित्यरत्न’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.