देवळा: स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव कार्यक्रमांतर्गत डीजी-एनसीसीच्या वतीने विशेष राष्ट्रीय अखंडता शिबिरात विजय मालिका आणि संस्कृतीचा महासंगम या महोत्सवाचे १० ते १९ डिसेंबरदरम्यान दिल्लीत आयोजन करण्यात आले आहे. त्यात भारतातून १७ डायरेक्टर सहभागी होणार असून, यात नाशिकच्या भऊर येथील लक्ष्मी पवारचादेखील समावेश आहे.
प्रत्येक डायरेक्टरमधून चार विद्यार्थी व एक राष्ट्रीय छात्रसेनेच्या अधिकार्यांची निवड झाली आहे. महाराष्ट्र डायरेक्टरमधून नाशिक येथील सेव्हन महाराष्ट्र बटालियनचे देवळा महाविद्यालयाचे एनसीसी अधिकारी लेफ्टनंट बादल लाड व विद्यार्थ्यांमधून लक्ष्मी पवार (देवळा महाविद्यालय), भाविका वैद्य (महाविद्यालय), विशाल आहेर (लासलगाव महाविद्यालय) यांची निवड करण्यात आली आहे.
सर्व राज्यातील प्रत्येकी चार विद्यार्थी यात सहभागी होणार आहेत. एकात्मतेसंदर्भातील गीत २२ भाषांमध्ये सादर केले जाणार आहे. वेगवेगळ्या राज्यातील वेशभूषा, संस्कृती, नृत्य असे कार्यक्रमही होणार आहेत. महाराष्ट्र बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल ए. के. सिंग व प्रशासकीय अधिकारी कर्नल राकेश कौल यांनी या विद्यार्थ्यांची निवड करून शुभेच्छा दिल्या. या निवडीबद्दल भऊरचे सरपंच दादा मोरे, माजी सरपंच कारभारी पवार, उपसरपंच योगिता पवार आदींनी अभिनंदन केले.