नाशिक : वडापाव म्हटला की प्रत्येकाच्याच तोंडाला पाणी येते. हा लज्जतदार वडापाव मुंबईतच नव्हे तर नाशिक करांसाठी ही जिव्हाळ्याच विषय ठरतो. गेल्या वर्षी जानेवारीत १२ रुपयांवरून १५ रुपयांवर आलेला हा वडापाव आता १५ वरून १८ रुपयांना विक्री करण्याचा निर्णय शहरातील व्यावसायिकांनी घेतलाय. युक्रेन-रशिया युद्धाचे परिणाम म्हणूनच इंधन, गॅस, खाद्यतेलांचे दर गगनाला भिडू लागले. परिणामी, नाशिकच्या वडापावलाही या गोष्टींची झळ बसून नाशिककर खवैय्यांच्या खिशाला कात्री बसणार आहे.
कोरोनामुळे कंबरडे मोडलेल्या अनेक हॉटेल व्यावसायिकांना भाडेशुल्कही अवघड होऊन बसले होते. कशीबशी आता परिस्थिती पूर्वपदावर येत असताना पुन्हा युद्धाच्या परिणामांना सामोरे जावे लागत असल्याने महागाईचा भडका उडत आहे. यात व्यावसायिक होरपळत असून, वाढत्या किंमतींमुळे त्यांना दरवाढीशिवाय पर्याय राहिला नसल्याचे सांगितले जातेय.
किराणा माल, वाहतूक खर्च, दुकान भाडे, कारागिरांचा पगार, वीज-पाणी आदी खर्च पाहता उत्पन्न कमालीचे खालावले आहे. खाद्यतेल, बेसनपीठासह किराणा वस्तू, सिलिंडर प्रचंड महागल्याने शहरातील सर्व अल्पोपहार, हॉटेल व्यावसायिकांनी एकत्र येत १ एप्रिलपासून किंमत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती मयूर हॉटेलचे संचालक निवास मोरे यांनी ‘आपलं महानगर’शी बोलताना दिली.