सटाणा : शेतकर्यांना कृषीपंपाना मीटर न बसवताच अवास्तव वीजबिले दिली जात असून, ही बिले न भरल्यास आगाऊ सूचना न देता कृषीपंपाची वीज खंडीत करणे किंवा ट्रान्सफॉर्मर बंद करण्याचे प्रकार महाराष्ट्रासह जिल्ह्यातील महावितरणकडून सुरू असल्याने शेतकर्यांत संतापाची लाट उसळली आहे.
महावितरणने 2003 सालात केलेली नियमावली व 2006 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणात दिलेल्या निकालाचा विसर पडला असल्याचा आरोप शेतकर्यांनी केला. विजनियामक आयोग, कृषी वीजबिल तपासणी समितीचा अहवाल, वीजसेवा भरपाई कायदा, वीज वापराबाबत व बिलांबाबतचे विविध करार यांचाही महावितरणला विसर पडल्याने शेतकरी आता संतप्त झाले आहेत.
लोहोणेरचे शेतकरी व महाराष्ट्र भाजप सोशल मीडिया संयोजक प्रवीण अलई, योगेश पवार, माजी सरपंच अशोक अलई, दत्तात्रय नेरकर, अनिल धामणे, दादा बस्ते, स्वप्निल अलई आदींच्या शिष्टमंडळाने ठेंगोडा येथील महावितरणचे अभियंता कुंभारे यांची भेट घेत अवाजवी बिले पाठवून सुरू असलेली वसुली थांबवण्याची मागणी करत तसे निवेदन दिले.