विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीनंतर चर्चांणा उधाण आलं. या पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी शरद पवार-फडणवीस भेटीमागचं कारण स्पष्ट केलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी तब्येतीची विचारपूस करण्यासाठी शरद पवार यांची सोमवारी सदिच्छा भेट घेतल्याची माहिती नवाब मलिक यांनी दिली.
शरद पवारांवर शस्त्रक्रिया झाल्यावर ते हॉस्पिटलमध्ये होते आणि त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घरी विश्रांती घेत होते. या कालावधीत अनेक लोकांनी तब्येतीची घरी येऊन विचारपूस केली होती. त्याच अनुषंगाने देवेंद्र फडणवीस यांनी ही सदिच्छा भेट घेतली दुसरं काही नाही असेही नवाब मलिक म्हणाले.
महाराष्ट्रात सत्ताधारी आणि विरोधी पक्ष दुश्मनासारखे काम करत नाहीत ही महाराष्ट्राची परंपरा आहे. इथे व्यक्तीगत नाती टिकवली जातात शिवाय व्यक्तीगत गाठीभेटी या होत असतात. परंतु या भेटी राजकीय कारणासाठी होतात असा अर्थ काढणे चुकीचे असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले.
विरोधी पक्षाचे काम विरोधी पक्ष करत असतो तर सत्ताधारी सत्ताधाऱ्यांचे काम करत असतात. महाविकास आघाडी शरद पवारसाहेबांनी बनवली आहे. त्यामुळे कुणीही या भेटीचा चुकीचा अर्थ लावून प्रचार करू नये. शिवाय देवेंद्र फडणवीस यांनी ही सदिच्छा भेट होती असे जाहीर केले आहे असेही नवाब मलिक म्हणाले.
हेही वाचा – शरद पवार-फडणवीस भेटीवर संजय राऊतांची प्रतिक्रिया, म्हणाले…