एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्याकडून सहा प्रकरणांचा तपास काढून घेण्यात आला आहे. यामध्ये आर्यन खान आणि समीर खान प्रकरणाचाही समावेश आहे. दरम्यान, समीर वानखेडे यांच्याकडील तपास काढून घेतल्यानंतर राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली. ही तर फक्त सुरुवात आहे, अशी सूचक प्रतिक्रिया नवाब मलिक यांनी दिली आहे.
नवाब मलिक यांनी ट्विट करता प्रतिक्रिया दिली आहे. समीर वानखेडे यांना पाच प्रकरणांच्या तपासावरून हटवण्यात आलं आहे. एकूण २६ प्रकरणे असून त्याची चौकशी होणं आवश्यक असल्याचं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. तसच ही सुरुवात असून सगळी यंत्रणा स्वच्छ करण्याची आवश्यकता आहे आणि ती आम्ही करणार, असं नवाब मलिक यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
Sameer Wankhede removed from 5 cases including the Aryan Khan case.
There are 26 cases in all that need to be probed.
This is just the beginning… a lot more has to be done to clean this system and we will do it.— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) November 5, 2021
दरम्यान,आर्यन खानच्या अटकेनंतर नवाब मलिक यांनी या कारवाईवरच प्रश्न उपस्थित केले होते. नवाब मलिक यांनी सातत्याने गेले काही दिवस पत्रकार परिषद घेऊन समीर वानखेडे यांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उभे केले होते. त्याशिवाय समीर वानखेडे यांनी अवैध मार्गाने सरकारी नोकरी मिळवली असल्याचा आरोपही मलिक यांनी केला होता. समीर वानखेडे यांच्या कार्यपद्धतीवर आणि त्यांच्या लाइफस्टाइलवरह तसंच वानखेडे यांचं जातप्रमाणपत्र खोटं असल्याचा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी केले आहेत.
या आरोपांची चौकशी सुरू आहे. त्यामुळे आता आर्यन खानसह सहा प्रकरणांचा तपास दिल्ली एनसीबी करणार आहे. यामध्ये नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांच्या प्रकरणाचाही समावेश आहे. अरमान कोहली, इक्बाल कासकर, काश्मीर ड्रग्ज प्रकरणाचा तपासही वानखेडे यांच्याकडून काढून घेण्यात आला आहे.