पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या मुंबई दौऱ्यानंतर पुन्हा एकदा भाजपविरोधात आघाडी निर्माण कऱण्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. काँग्रेसशिवाय आघाडी निर्माण करण्याबाबतचे वक्तव्य ममता बॅनर्जी यांनी केलं आहे. परंतु भाजपविरोधात देशात आघाडी काँग्रेसशिवाय निर्माण करणं अशक्य असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक म्हणाले आहेत. तसेच या आघाडीचे नेतृत्व सामूहिक असेल असे वक्तव्य नवाब मलिक यांनी केलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी यापुर्वीच स्पष्ट केलं आहे की, देशात विरोधकांची मोट बांधायची आहे. पण मोट बांधताना काँग्रेसशिवाय एकजूट होऊ शकत नाही. काँग्रेससह जे नॉन युपीएचे पक्ष आहेत ज्यांच्या खासदारांची संख्या जवळपास १५० आहे. अशा सगळ्यांना सोबत आणायचे आहे. त्यासाठी सगळ्यांना एकजूट करायचे आहे. काम सुरु आहे. आगामी काळात काँग्रेससोबत सर्व विरोधी पक्षांची मोठी बांधून आघाडी निर्माण करण्याचे काम होईल. त्याचे नेतृत्व कोण करेल आता तो विषय नाही सामूहिक नेतृत्व राहिल अशी चर्चा आहे. पुढे निर्णय घेऊ अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली आहे.
काँग्रेसशिवाय पर्याय नाहीच
काँग्रेसशिवाय कुठलीही विरोधकांची एकजूट होऊ शकत नाही. हे गेल्या १ वर्षांपासून शरद पवार सांगत आहेत. ममता बॅनर्जींचे सुद्धा हेच मत आहे की, सगळे विरोधक एकजूट झाले पाहिजेत. सगळ्यांच्या एकजुटीने मोर्चा बांधू एक पर्याय देशात निर्माण करुन देऊ असे नवाब मलिक म्हणाले. निश्चितरुपाने २०२४ ला या देशामध्ये जी परिस्थिती निर्माण झाली त्याविरोधात आगामी लोकसभा निवडणूक जेव्हा होईल तेव्हा देशात परिवर्तन होणार आहे असे नवाब मलिक म्हणाले आहेत.
हेही वाचा : ST workers strike : मेस्मा लावण्याऐवजी कर्मचाऱ्यांशी चर्चा करा – देवेंद्र फडणवीस