देशात महाराष्ट्रातून कोरोना पसरला असल्याचे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत केले आहे. कोरोना काळात मजूरांनी स्थलांतर केल्यामुळे आणि काँग्रेसनं तिकीट काढून मजूरांना त्यांच्या राज्यात पाठवल्यामुळे कोरोना पसरला असे पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत. महाराष्ट्र कोरोनाचा सुपर स्प्रेडर ठरला असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यावर विरोधकांनी हल्लाबोल केला आहे. देशात कोरोना मोदींमुळे पसरला, अर्थव्यवस्था ढासळली, बेरोजगारी वाढण्यासाठी मोदी जबाबदार असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी गोव्यात माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी नवाब मलिक म्हणाले की, कोविड जेव्हा जगभरात पसरत होता तेव्हा केंद्र सरकार आणि पंतप्रधानांना विनंती करत होतो की, आंतरराष्ट्रीय विमान प्रवास बंद करा याकडे केंद्राने दुर्लक्ष केले याचे मुख्य कारण आहे ते म्हणजे नमस्ते ट्रम्पचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यामुळे परदेशी प्रवाशांवर आणि आंतरराष्ट्रीय सीमा बंद करण्यात आल्या नाहीत.
यानंतर देशात लॉकडाऊन करण्यात आला मग थाळी वाजवा आणि टाळी वाजवा असे सांगण्यात आले. देशातील सर्व अधिकार महामारीच्या कायद्यानुसार पंतप्रधान मोदींनी आपल्याकडे घेतले होते. मोदींनी जबाबदारीने वक्तव्य केले पाहिजे. लॉकडाऊनची घोषणा पंतप्रधानांनी केली होती. यानंतर आता ते राज्यांवर खापर फोडत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे देशात कोरोना महामारी पसरली आहे. देशात अर्थव्यवस्था ढासळली, बेरोजगारी वाढली, लोकांचा मृत्यू झाला याची संपूर्ण जबाबदारी मोदी सरकारची असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.
हिजाब म्हणजे केस झाकणे
हिजाब म्हणजे केस झाकणे आहे. हिजाब म्हणजे बुरखा नाही. शाळेच्या ड्रेसकोडमध्ये जर मुलगी केस झाकुन शाळेत जात असेल तर त्यावर आक्षेप घेण्याचे काही कारण नाही. मला वाटतं कर्नाटकमध्ये जे काही सुरु आहे. ते लहान मुलांच्या मनात वीष पेरण्याचे काम सुरु आहे. भाजपवाले ठरवतील कोणी काय खायचे, कोणी काय घालायचे? देशात सगळ्यांना मूलभूत अधिकार नागरिकांना देण्यात आले आहे. सगळी वातावरण निर्मिती उत्तरप्रदेशच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करण्यात येत असा पलटवार नवाब मलिक यांनी केला आहे.
हेही वाचा : Hijab Row: हिजाब मुद्द्यावर गृहमंत्र्यांचे वक्तव्य, ‘राजकीय फायद्यासाठी अशा प्रकारे…’