राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक मागील काही दिवसांपासून एनसीबीच्या कारवाईर टीका करत आहेत. एनसीबी विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी केलेल्या ड्रग्ज कारवाईवर नवाब मलिकांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. मलिकांचा जावई नुकताच तुरुंगातून बाहेर आला आहे. परंतु एनसीबीने स्थापन केलेल्या एसआयटी चौकशीमुळे त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. मलिक यांचा जावई समीर खानच्या संबंधित दोघांची चौकशी करण्यासाठी एसआयटीने समन्स जारी केले आहेत.
राष्ट्रवादी नेते नवाब मलिक यांचा जावई समीर खानला ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली होती. समीर खानचा न्यायालयाने १७ सप्टेंबर रोजी जामीन मंजूर केला आहे. त्याच्यासह राहिला फर्निचरवाला आणि करण सजनानी यांचाही जामीन मंजूर करण्यात आला आहे. करण सजनानीकडे काही औषधे होती ती एनसीबीने जप्त केली होती. या तीघांचा ड्रग्ज, गांजा खरेदी -विक्री करण्याचा कट होता असा दावा एनसीबीकडून करण्यात आला होता. अखेर ८ महिन्या नंतर नवाब मलिकांच्या जावयाला एनडीपीएस कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. परंतु हे प्रकरण पुन्हा उघडण्याची शक्यता आहे.
एनसीबीने स्थापन केलेल्या एसआयटी टीमने तपास सुरु केला असून अता चौकशीसाठी समीर खानशी संबंधित दोन जणांना समन्स पाठवण्यात आले आहेत. यामुळे नवाब मलिकांच्या आणि त्यांच्या जावयाच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. समीर खानने न्यायालयीन अटींचे उल्लंघन केल्यामुळे त्याच्याविरोधात न्यायालयात जाणार असल्याचेही एनसीबी अधिकाऱ्याने सांगितले आहे.
Mumbai | SIT formed by Narcotics Control Bureau has summoned two persons for questioning in connection with a drug case involving Maharashtra minister Nawab Malik’s son-in-law Sameer Khan
— ANI (@ANI) November 9, 2021
जावई समीर खान याच्या अटकेनंतर नवाब मलिकांनी एनसीबीवर अनेक आरोप केले आहेत. क्रूझ ड्रग्ज प्रकरणात नवाब मलिकांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर बोगस ड्रग्ज कारवाई आणि वसुलीचे आरोप केले आहेत. तसेच आर्यन खान प्रकरणात वसुली करण्यासाठी कारवाई करण्यात आली असल्याचा आरोप नवाब मलिकांनी केला आहे. तसेच महाराष्ट्राला आणि महाविकास आघाडीला बदनाम करण्यासाठी हे षडयंत्र रचले असल्याचा आरोपही नवाब मलिकांनी केला आहे.
हेही वाचा : भाजपने एसटीचे विलिनीकरण का केले नाही?