राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि ओबीसी समाजातील आश्वासक चेहरा म्हणून ज्यांच्याकडे पाहीले जात होते, असे बीड शहरातील आमदार जयदस्त क्षीरसागर यांनी राष्ट्रवादीपासून आता फारकत घेतली आहे. कानामागून आले आणि जड झाले, अशी खंत व्यक्त करत क्षीरसागर यांनी भाजपच्या उमेदवार डॉ. प्रीतम मुंडे यांच्या विजयाची गुढी उभारणार असल्याचे कार्यकर्त्यांच्या बैठकीत सांगितले. क्षीरसागर यांनी आपल्या भाषणात कुणाचेही नाव घेतले नाही. पण त्यांच्यानंतर राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या धनंजय मुंडे यांच्यावरच त्यांचा टीकेचा सर्व रोख होता.
काल जयदत्त क्षीरसागर यांनी फेसबुकवर ‘लढा’ अशी फेसबुक पोस्ट टाकून खळबळ उडवून देणार याचे सुतोवाच केले होते. त्याप्रमाणे त्यांनी आज बीड शहरात कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला. या मेळाव्यात त्यांनी आपली भूमिका जाहीर केली. भाजपच्या उमेदवार डॉ. प्रीतम मुंडे यांच्या विजयाची गुढी उभारूया, अशी घोषणा त्यांनी आज केली. मात्र भाजपमध्ये प्रवेश करणार का? याबाबत त्यांनी खुलासा केलेला नाही. त्याचा निर्णय १८ एप्रिलला घेऊ, असे त्यांनी सांगितले.
या मेळाव्यानंतर क्षीरसागर यांनी एक भावनिक पोस्ट करत या निर्णयाची कारणीमीमांसा सांगितली. “राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून पक्ष वाढविण्यासाठी आम्ही अपार कष्ट घेतले. आमच्या बीड जिल्ह्यात गावागावापर्यंत पक्ष नेला. सन २००९ च्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील ६ पैकी ५ जागा ह्या आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस ने लढविल्या होत्या. त्या वेळी ५ पैकी ५ जागा राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकल्या होत्या. पक्ष सर्व स्तरावर आम्ही वाढविला. मात्र बाहेरून पक्षात आलेल्या काही लोकांनी पक्ष हायजॅक करून पक्ष विरोधी भूमिका घेऊन पध्दतशिरपणे पक्ष संपविला. तुलनेने या नवीन सरकार च्या काळात बीड जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात निधी दिलाय. आमचं राजकारण हे कायम विकासासाठी, न्यायासाठी, समाजकारणासाठी आहे. त्यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत युतीच्या उमेदवार डॉ. प्रितम मुंडे यांच्या विजयाची गुडी उभारणार. मोदींना समर्थन देत डॉ. मुंडेंना निर्णायक मतदानाने निवडून आणण्याचा संकल्प आ. जयदत्त क्षीरसागर यांनी आज संकल्प मेळाव्यात केला.”