घरताज्या घडामोडीमहाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस, जातीयवाद असं नवीन विष पेरण्याचे कारस्थान राज ठाकरेंकडून सुरू...

महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस, जातीयवाद असं नवीन विष पेरण्याचे कारस्थान राज ठाकरेंकडून सुरू आहे – महेश तपासे

Subscribe

पवार साहेब कधीही छत्रपतींचं नाव घेताना कुठल्याही सभेत दिसणार नाहीत. कारण छत्रपतींचं नाव घेतल्यानंतर मुसलमान मतं गेली तर काय करायचं, म्हणून आमच्या शिवछत्रपतींचं ते कधीही नाव घेत नाहीत, असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवर घणाघात केला.

“पवार साहेब कधीही छत्रपतींचं नाव घेताना कुठल्याही सभेत दिसणार नाहीत. कारण छत्रपतींचं नाव घेतल्यानंतर मुसलमान मतं गेली तर काय करायचं, म्हणून आमच्या शिवछत्रपतींचं ते कधीही नाव घेत नाहीत, असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवर घणाघात केला. राज ठाकरेंच्या या भाषणानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी राज ठाकरेंवर टीका केली आहे. तसंच ‘राष्ट्रवादी काँग्रेस आणि जातीयवाद असं नवीन विष पेरण्याचे कारस्थान राज ठाकरेंच्या माध्यमातून महाराष्ट्रात सुरु झालंय’ असा आरोप महेश तपासे यांनी केला आहे.

‘मंडल आयोगाची अंमलबजावणी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार असो की पवारसाहेबांनी केलेली बहुजनांच्यासाठीची कामे राज ठाकरेंना माहित नाही का? महाराष्ट्रात मागासवर्गीय आणि आदिवासींसाठी स्वतंत्र बजेट या देशात पहिल्यांदा शरद पवार यांनी केले याची माहिती नाही का?’, असा थेट सवालही महेश तपासे यांनी राज ठाकरे यांना केला आहे.

- Advertisement -

‘शरद पवारसाहेबांनी कधीच छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतले नाही हे राज ठाकरे यांचे वाक्य अतिशय हास्यास्पद आहे. शाहू – फुले – आंबेडकर आमचे सामाजिक दैवत होते आहे आणि राहतील असे सांगतानाच शाहू – फुले – आंबेडकरांचे नाव घेणे चूक आहे का? हे राज ठाकरे यांनी मला सांगावे’, असं तपासे यांनी म्हटलं. तसंच, ‘बारा बलुतेदार, अठरापगड जातीचा महाराष्ट्र आणि या महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेण्यासाठी गेल्या ५०-५५ वर्षं अविरत पवारसाहेबांनी जी मेहनत घेतली याची राज ठाकरेंना काय माहिती’, असा प्रश्नही उपस्थित केला.

पवारांचे कृषी धोरण, औद्योगिक धोरण, महिलांविषयीचे धोरण, युवकांविषयीचे धोरण, मागासवर्गीय समाजातल्या गोरगरीब समाजातल्या लोकांचे कल्याण होऊ शकलं आणि ते सरकारी योजनांमध्ये त्यांचा समावेश करून त्यांना स्वावलंबी बनविण्यामध्ये पवारांचा मोठा हात आहे. महाराष्ट्रात मागासवर्गीय समाजाचे पारंपरिक व्यवसाय शरद पवारांच्या नितीमुळेच बंद होऊ शकले आणि आज मागासवर्गीयांची मुले डॉक्टर, वकील, इंजिनिअर अशा उच्चभ्रू पदावर कार्यरत असल्याचं महेश तपासे यांनी म्हटलं.

- Advertisement -

‘शरद पवार कदाचित मंदिरात फार जात नसतील परंतु राज्यातील व देशातील जनतेलाच दैवत म्हणून सदैव त्यांच्या सेवेच्या रुपाने पूजन करून त्यांचा विकासरुपी आशीर्वाद हा महाराष्ट्राला पवारांनी प्राप्त करून दिला आहे. तसंच, आंबेडकर जयंतीला एक दिवस बाकी असतानासुद्धा डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या साध्या शुभेच्छादेखील बहुजन वर्गाला राज ठाकरे देऊ शकले नाहीत’, असंही महेश तपासे यांनी म्हटलं.

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -